कोकणात संततधार; रेल्वे चार तास उशिराने - Marathi News 24taas.com

कोकणात संततधार; रेल्वे चार तास उशिराने

www.24taas.com, रत्नागिरी/सिंधुदुर्ग
 
कोकण रेल्वेला जोरदार पावसाचा फटका बसला. मात्र, लांजा ते आडवली दरम्यान  कोसळलेली दरड हटविण्यात आली आहे.  कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक चार तासान उशिराने धावत आहे.  कोकणमध्ये संततधार पाऊस सुरू झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला  झोडपून काढले आहे. मालवण येथे माड कोसळून एक जण जखमी झाला.
 
रत्नागिरीतील लांजा ते आडवली दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक चार तासांपासून ठप्प होती. त्यामुळे अनेक गाड्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या.  पावसाचा फटका बसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. दरम्यान, रेल्वे मार्गावर आलेली माती सातवाजेपर्यंत दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. रेल्वे मार्गावरील हा पहिला अपघात असल्याचे सांगण्यात आले.
 
संथ गतीने  रेल्वे वाहतूक
माती हटविण्‍यात आल्‍यानंतर संथ गतीने वाहतूक सुरु झाली आहे. दोन्‍ही दिशेने धावणा-या गाड्या सुमारे चार तास उशीराने धावत आहेत. रेल्वे मार्गावर आलेली माती सातवाजेपर्यंत दूर करण्यात प्रशासनाला यश आले. एर्नाकुलम -पुणे एक्सप्रेस रत्नागिरीत थांबविण्‍यात आली होती. तर गरीब रथ एक्‍स्‍प्रेस सावर्डे स्टेशनवर, मंगलोर एक्स्‍प्रेस खेड स्टेशनवर, राज्य राणी एक्सप्रेस वीर स्टेशनवर आणि कोकणकन्या एक्सप्रेस माणगाव स्टेशनवर थांबवण्यात आल्‍या होत्‍या. या सर्व गाड्या डाऊन दिशेच्या आहेत. तर कणकवलीजवळ अप दिशेची मंगला एक्सप्रेस खोळंबली होती.
 
जोरदार पावसाला सुरूवात 
सिंधुदुर्गात काल पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झालीय. मान्सूनच्या आगमनानंतर लपंडाव करणा-या पावसानं आता ख-या अर्थानं हजेरी लावलीय. जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. रविवार असल्यानं तरूणही या पावसाचा आनंद घेताहेत. पावसामुळे धबधब्यांनाही पाणी आल्यानं कोकणचं निसर्गसौंदर्य पुन्हा बहरलंय.  सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरीतही पावसानं हजेरी लावलीय. कोसळणा-या जलधारांनी नद्यांना पाणी येऊ लागलं आहे.

First Published: Monday, June 18, 2012, 10:23


comments powered by Disqus