'विटावा सबवे'साठी परांजपे- आव्हाडांमध्ये हेवेदावे - Marathi News 24taas.com

'विटावा सबवे'साठी परांजपे- आव्हाडांमध्ये हेवेदावे

www.24taas.com, ठाणे
 
ठाण्यातल्या विटावामधल्या सबवेचं गेल्या वर्षापासून काम सुरू आहे. शिवसेना खासदार आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या सबवेच्या ठिकाणी पोहोचले. आणि अचानक नारळ फोडून या मार्गाचं उद्घाटन केलं. आम्हीच या कामाचा पाठपुरावा केलाय, त्यामुळेच हे काम झालं, असा दावा दोघांनीही केलाय.
 
विशेष म्हणजे उद्घाटन झाल्यावर फक्त पंधरा मिनिटांसाठी हा सबवे सुरू करण्यात आला. त्यानंतर लगेच बंद करण्यात आला. त्यामुळे हा फक्त स्टंट असल्याची टीका महापौरांनी केलीय. त्याचबरोबर हे काम महापालिकेनंच केल्याचा दावा करत, श्रेय घ्यायलाही ते विसरले नाहीत.
वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पंधरा मिनिटांसाठी का होईना, या सबवेचं उद्घाटन झालं. पण उद्घाटनानंतर परतताना याच ठिकाणच्या वाहतूक कोंडीत आमदार आणि खासदार अडकले. आता आचारसंहिता भंगावरुन नेत्यांवर कारवाई होईलही. पण या मुद्द्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई रंगणार आहे.
 

First Published: Wednesday, June 20, 2012, 22:28


comments powered by Disqus