मध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प - Marathi News 24taas.com

मध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प

www.24taas.com, विठ्ठलवाडी
 
 
अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान बिघाड झाल्याने वाहतूक काही वेळ  खोळंबली. मात्र, लोकल उशीरा धावत  असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे रेल्वे रोखल्या आणि गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
 
 
आज सकाळी १५ ते २० मिनिटे लोकल उशीरा धावत असल्याने प्रवाशी संतप्त झाले होते. याचवेळी अंबरनाथ लोकलमध्ये बिघाड झाल्याने गाड्यांना आणखी उशीर झाला. कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यान वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे विठ्ठलवाडी येथे प्रवाशांनी रेल्वे रोखून धरल्या. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. त्यामुळे उशीरा धावणाऱ्या गाड्यांना अधिकच उशीर झाल्याने संतप्त प्रवाशांनी लोकलवर दगडफेक केली. याचवेळी मोटरमनला मारहाण करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली.
 
 
प्रवाशांनी लोकल रोखून धरल्याने कल्याण -कर्जत वाहतूक ठप्प पडली आहे. दरम्यान, अंबरनाथमध्ये लोकल गाड्यांवर दगडफेक केल्याने रेल्वे थांबवाव्या लागल्यात. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ला येथे सिग्नल यंत्रणेला आग लागल्याने तीन दिवस मध्य मध्य आणि हार्बरची सेवा विस्कळीत होती. आज लोकल बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचा कारभार भोंगळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published: Thursday, April 26, 2012, 11:09


comments powered by Disqus