Last Updated: Wednesday, May 15, 2013, 07:44
रोहित गोळे, कॉपी रायटर, झी मीडिया सहज किती तू बोलून गेलीस, झाले गेले विसरायाचे...
झुरणे आता, झुलणे आता, झोले सारे विसरायाचे...
कधी भेटलो, कधी पेटलो, कधी दाटलो विसरायाचे...
आठवीत मी बसतो आता काय काय मज विसरायाचे...
(कवी - वलय मुळगुंद) ‘ती’ आणि ‘तो’ आपल्या जीवनात हे नातं नेहमीच असतं... असेच ‘ती’ आणि ‘तो’ होते तरी कसे... आहेत तरी कसे? कॉलेज म्हंटलं की, कुणासाठी तरी नजर भिरभिरत असते. आपलं माणूस शोधण्यासाठी नजर कावरी बावरी झालेली असते. अशाच एका कॉलेजमधल्या ‘ती’ आणि ‘तो’ ची ही कथा... तो... कॉलेजमध्ये आधीच उशीरा दाखल झालेला... दोन ते तीन दिवस काय चाललयं हेच कळायला त्याला मार्ग नव्हता... मग असाच काही दिवस मख्ख सारखा यायचा बसायचा आणि जायचा... हा पण वर्गात त्याची नजर सतत कोणाला तरी शोधीत होती... कोणाला... हे त्याला ही माहित नव्हतं... आणि अखेर चार पाच दिवसांनी त्याची नजर स्थिरावली... ‘ती’च्या अवखळ हसण्याने... तिचं हसणं म्हणजे जणू काही प्राजक्तांच्या फुलांचा सडाच... आणि त्या हसण्यात तो स्वत:ला कधी हरवून बसला हे त्याचं त्यालाही कळलं नाही... तिचाकडे पाहतचं राहिला... आणि हसता हसता... तिचंही त्याच्याकडे लक्ष गेलं... ‘कोण हा’...? अतिशहाणाच वाटतोय जरा... असच तिच्याही मनात येऊन गेलं असणार... काही वेळाने तोही भानावर आला. वर्गात आपण एकटेच नाहीयेत याची त्याला जाणीव झाली. पण तरीही सबंधं लेक्चर तिच्याकडे चोरून पाहणं काही त्याने सोडलं नाही. तीपण मध्येच एखादा कटाक्ष टाकीत होती. आणि तो पुन्हा पुन्हा मोहरून जात होता....
दोघांची ओळख व्हायला फारसा वेळ काही लागला नाही. वर्गात तरी मोजकीचं मुलं... त्यामुळे सगळ्यांशी ओळख करून घेणं तसं सोपं होतं. मग एके दिवशी तिचा त्याला फोन आला... आणि मग तो मात्र चांगलाच उडाला... तिने तिच्या मृदू.. आणि गोड आवाजात त्याचं नाव घेतलं. दोन क्षण त्यालाही कळलं नाही. हे काय घडलं. मग मात्र स्वत:ला सावरत तिला फोन करण्याचं कारण विचारलं. म्हणे तिचं काही तरी कामं होतं. कॉलेज संदर्भात... मग काय हा मदत करण्यासाठी एका पायावर तयारच होता. हळूहळू.. दोघांमध्ये फार चांगली मैत्री झाली.. तिच्याशिवाय त्याचं पान हलंत नव्हतं. ती देखील तो कॉलेजला आला नाही की अस्वस्थ व्हायची. आता तर वर्गात दोघंही शेजारीच बसायचे. ती त्याला नेहमी म्हणायची अभ्यासात लक्ष दे... आणि तो तिला नेहमी म्हणायचा. ‘तू आहेस ना... मग मला कसली काळजी...’
दिवसामागून दिवस सरत होते. तो... तसा फार संवेदनशील होता. सगळ्यांमध्ये स्वत:ला हरवून जाणारा होता. मित्र-मैत्रिणी सारं त्याच्यासाठी खूप काही वाटायचं.. तिला सुद्धा मित्र-मैत्रीणी फार हवेहवेसे वाटायचे... पण ती (प्राक्ट्रिकल) होती. ती नेहमी त्याला म्हणायची.. इतका सगळ्यांमध्ये अडकू नकोस... त्रास होईल. आणि तो नेहमीच हसत हसत म्हणायचा. ‘मी असाच आहे गं...!’ त्याला कोणी काही बोललं की, ती मात्र चिडायची... त्याला नेहमी समजवायची.. म्हणायची.. 'असा नको रे वागूस... असा कसा रे तू... एके दिवशी तुला फार मोठं झालेलं पाहायचंय.. सावर स्वत:ला नको अडकूस साऱ्यांच्या बंधनात...' पण तो होताच जरासा मुडी... पण मनाने निर्मळ होता.. छक्के-पंजे कधीच नाही कळायचे त्याला. ती मात्र नेहमीच त्याच्या पाठीशी उभी असायची ठामपणे.... आणि म्हणूनच ती त्याला नेहमीच आवडायची.. तिच्यासाठी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करीत होता.

तिला देखील त्याच्याशिवाय करमायचं नाही. सारं काही मनातलं त्याला सांगायची. तो सुद्धा साऱ्या गोष्टी मनात ठेवायचा. ती तशी जराशी उथळच... पण तोही तिला हळूहळू ओळखू लागला होता. तिच्या मनात काही जरी असलं तरी आवाजावरूनच ओळखायचा. मग ती पण काही आडपडदा न ठेवता सारं काही सांगायची.. हळूहळू या नात्यात एक ओढ निर्माण होत गेली. साहजिकच ती होणारच होती. पण आता मात्र तो जास्तच तिच्याभोवती घुटमळायचा. वर्गातही साऱ्यांनाच ते दिसायचं. सारेजण तिलाही चिडवायचे. त्यालाही चिडवायचे. पण त्याच्या मनाची पूर्ण तयारी झालीच नव्हती. मग तो इतरांवर चिडायचा. ती मात्र नेहमीच शांत असायची. त्याला समजवायची. 'असू दे रे...' असं म्हणून छानसं हसली की मग आपसूकच त्याचाही राग शांत व्हायचा. कॉलेजचे काही दिवसच शिल्लक राहिले आता मात्र तो चांगलाच अस्वस्थ झाला. काय करावं तिला विचारावं का.. काय वाटेल तिला... इतकी चांगली मैत्रीण... असं विचारल्याने काय होईल. या विचारात अडकलेला. आणि अशातच एक दिवस कॉलेजही संपलं...
मित्र-मैत्रीण सारेच आप-आपल्या उद्योग-व्यवसायाला लागले. जो तो आपआपल्या कामाच्या व्यापात अडकलेला. तसा तो आणि ती सुद्धा... पण तरीही अजूनही दोघे एकमेकांसाठी खासच होते. कॉलेजसारंखं नेहमी भेटणं व्हायचं नाही. पण न चुकता फोनवर सारं काही सांगायचे दोघं एकमेकांना... कधी मग तो तिला म्हणायाचा. 'आज येशील भेटायला... ती पण सहजपणे म्हणायची ‘हो.... येईन की... खूप दिवस झाले भेटलो नाही ना..’ तो दिवस म्हणजे त्याला काय करू आणि काय नको असं व्हायचं. कधी ऑफिसातून निघतोय असं व्हायचयं... आणि तिला भेटला की तिच्यातच हरवून जायचा. मग ती सतत बोलायची आणि हा फक्त तिच्याकडे पाहत असायचा. मग ती हळूच त्याचा हात हातात घ्यायची आणि मग सोबतीला चालू लागायची. तसा त्याचा हात ती कॉलेजमध्ये असतानाही धरायची. पण कॉलेजपेक्षा आता त्याला काही तरी वेगळच वाटायचं.... त्यालाही फार आवडायचं तिचा हात हातात घेऊन चालणं. आणि मग मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर खूप वेळ तसंच चालत राहणं... कधी तिला अगदी घरापर्यंतही पोहचवायचा. आणि मग ती घराकडे जात असताना तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहायचा. पण कधी कधी असं काही व्हायचं की आठवडा आठवडाभर दोघंही बोलायचे नाही. तसा तो फार हट्टी होता. रागीष्ट होता. ती मात्र मनातलं सारं काही विसरून मग त्याला फोन करायची आणि त्याला म्हणायाची. ‘आज भेटूया’? तुझी आठवण येतेयं.. तसा तो अगदी विरघळून जायचा.
जवळजवळ असंच वर्ष सरलं. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. ती सुद्धा आता त्याच्यात अडकू लागली होती. आणि तोही याचीच वाट पाहत होता. आणि शेवटी एके दिवशी त्याने हिंमत करून तिला विचारलचं... तसा याबाबतीत तो अगदीच घाबरट होता. त्यासाठीही तिच्यासमोर तीन-तीनदा अडखळत होता. शेवटी तिच म्हणाली जरा हिंमत कर आणि मग काय ते बोल.. अखेर तिला मनातंल सारं काही सांगितलं... आणि पटकन तीही बोलून गेली. ‘मलाही तू आवडतोस.’ आणि त्याला हे सारं काही अनपेक्षितच होतं. तसंही त्याने तिला मागणीच घातली होती. तीदेखील त्यासाठी तयार होती.
काही दिवसातच दोघांमधील वाद-विवादांना तोंड फुटलं. दोघांनीही घरी सारं काही सांगितलं होतं. तो देखील तिच्यासाठी स्वत:ला बदलत होता. पण शेवटी नात्यात आल्याने दोघं जवळ येण्यापेक्षाही जास्त दुरावतच होते. कधी दोघं भांडले की, तो अबोला धरायाचा. आणि ती त्याला म्हणायची, ‘तुझं असं अबोला धरणं मला नाही आवडतं.’ तो हळवा होता तिच्यासाठी.. पण ती मात्र जरा जास्तच प्राक्ट्रिकल झाली होती. आणि मग मात्र तोही आता खूप वैतागायचा. दोघं एकमेकांना सारं काही सांगायाचे. पण तरीही दोघांना वाटायचं की काही तरी एकमेकांपासून लपवतायेत...
‘ती’ आणि ‘तो’ यांची मैत्री म्हणजे मासा आणि पाणी असंच होतं. पण या नात्याने त्यांची मैत्रीच संपली होती. ती त्याला नेहमी म्हणायची तू आता माझा मित्र राहिलाच नाहीस. आणि मग तोही तिच्यावर चिडायचा. काय होत होतं दोघांनाही कळत नव्हतं. अवस्था दोघांचीही वाईट होती. दोघेही चुकत होते. चुका कळतही होत्या. पण पुन्हा पुन्हा त्याच चुका करीतही होते. आता दोघंही संतापायचे, चिडायचे… आणि त्रासही दोघेच करून घ्यायचे. आणि शेवटी या सगळ्याचा अंत झालाच. दोघांनाही आता हे सहन होईनासं झालं. आणि त्या दोघांनाही अखेर वेगळं व्हायचं ठरवलं. संपलं होतं सारं काही... ती मैत्री, ते नातं... सारं हरवून गेलं होतं. दोघे वेगळे झाले. त्यानंतर ना नातं राहिलं ना मैत्री... ‘मैत्री...’ एक छानशी मैत्रीण, एक चांगला मित्र... या गोष्टीच नामशेष झाल्या होत्या. आता दोघेही फार दूर गेले होते. आपआपल्या वाटा धुडांळण्यात मग्नही झाले होते. पण तरीही एकमेकांत नेहमीच अडकलेले होते.
‘तो’ आजही त्या आठवणींने घायाळ होतो.... मग असाच एकटा जाऊन समुद्रकिनारी बसतो. आणि आपलं मन हलकं करून घेतो. ती देखील कामामध्ये स्वत:ला गुंतवून घेते, आणि त्या आठवणींना दूर सारते. पण आठवणीच त्या. दोघांना नेहमीच रक्तबंबाळ करून जातात... पण आजही त्याला वाटतं अशी एक तरी मैत्रीण नेहमीच हवी. आणि ती देखील अशाच मित्राची नेहमीच वाट पाहत बसते.
(ही एक काल्पनिक कथा आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी. यातील काही गोष्टींशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 10:28