Last Updated: Friday, March 2, 2012, 17:29
- प्रशांत जाधवऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत कांगारूंकडून व्हाइटवॉश मिळाल्यानंतर विश्वविजेती टीम इंडिया वन डेत काही तरी दिवे लावेल असे वाटत होते. मात्र, वन डेतही माती खात लवकरात लवकर मायदेशी परतण्याचे वेध टीम इंडियाला लागेल आहेत. कागदावर वाघ असणारे भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात गवत खातांना पाहिल्यावर भारतीय क्रिकेट रसिकांची तळपायाची आग मस्तकात जात आहे. हे असे का होत आहे, याचं कारण काय असे एक ना अनेक प्रश्न क्रिकेट रसिकांना सतावत आहेत. याचं मोठं आणि आर्थिक कारण आयपीएलमध्ये दडलं आहे. त्यामुळे भारताला सीबी सिरिजची फायनलचं खेळण्यात स्वारस्य नाही.
आता बोनस गुणासह भारत फायनलमध्ये जाणार अशी भाबडी आशा क्रिकेट रसिकांना वाटत आहे. परंतु, असे होणार नाही याची मला खात्री आहे. या मालिकेत श्रीलंकेने जो खेळ दाखवला आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियासोबत फायनल खेळण्याची खरी लायकी श्रीलंकेची आहे. मायदेशी जाण्यापूर्वी झुंज दिली,मानहानीकारक पराभव पत्करून परतलो नाही, असे दाखविण्यासाठी आजचा विजय हे उत्तम उदाहरण सांगता येईल. तसेच, या विजयामुळे खेळाडूंचे दोन फायदे झाले. एक तर बऱ्याच काळासाठी क्रिकेट रसिकाचे शिव्या शाप मिळणार नाही. तर दुसरा फायदा जाहिरातदारही यातील काही खेळाडूंची पाठ सोडणार नाही. म्हणजे आता फायनलमध्ये पोहचले नाही तर उजळ माथ्याने हे खेळाडू मायदेशी येवू शकतात हे नक्की...
आयपीएलच्या जाहिरातीचं अर्थकारणयेत्या ४ एप्रिलपासून आयपीएलचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी टीम इंडियातील खेळाडूंसह जगभरातील इतर धुरंधर फलंदाज आपली अस्त्र पारजून तयार आहेत. आयपीएल

म्हणजे पैशांचा बाजार! यात सगळीकडे पैसाच पैसा आहे. हीच पैशाची ओढ टीम इंडियाला मायदेशी लवकर परतायला कारणीभूत ठरते आहे.आयपीएलच्या सध्या जाहिराती सुरू झाल्या आहेत. परंतु, त्यात कुठेही भारतीय खेळाडू नाहीत. आता सीबी सिरीज संपल्यावर ढाक्यात आशिया कप आहे, त्यामुळे भारतीय खेळाडूंना जाहिरातींची असाइंमेंट करण्यासाठी फारच कमी वेळ आहे. त्यामुळे आता फायनल न खेळता लगेच भारताकडे कूच केली तर जाहिराती पदरात पडतील आणि या ‘गरीब’ खेळाडूंच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटेल, असे एकंदरीत चित्र आहे.
तारखांचे गणित

सध्याची सुरू असलेल्या सीबी सिरिजचे वेळापत्रक पाहिल्यास स्पर्धेतील दुसरी फायनल ६ मार्चला आहे. तर तिसरी फायनल ८ मार्चला आहे. या स्पर्धेत सलग २ फायनल सामने जिंकल्यावर तिसरी फायनल होत नाही. त्यामुळे भारताने फायनलमध्ये धडक मारली असती तर सर्व खेळाडूंना ६ मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियात राहावे लागले असते. आता २ मार्चला ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामन्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना ऑस्ट्रेलिया थांबावे लागणार आहे. त्यामुळे ३ मार्च ते ११ मार्च हा मोठा कालावधी भारतीय संघाला जाहिरातीसाठी मिळणार आहे. (१२ मार्चपासून आशिया कप स्पर्धेला सुरूवात होत आहे.)
डागाळलेला इतिहास
यापूर्वी २००९मध्ये धोनी आणि हरभजनसिंग यांनी प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्याऐवजी जाहिरातींची शुटिंग करणे पसंत केले होते. धोनी आणि हरभजनसिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्याचे वितरण राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते होणार होते. परंतु, या पुरस्कार वितरण सोहळ्यात या दोघांनी दांडी मारली होती. न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ आयपीएलच्या दुसऱ्या सिझनसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. या काळात जाहिरातीचे केलेले करार पूर्ण करण्यासाठी दोघांनी राष्ट्रपती भवनाकडे पाठ फिरवली आणि जाहिरातीला पसंती दिली. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तोच प्रकार आताही होणार आहे. ऑस्ट्रेलिया विजयी होऊन भारतीयांची मान उंचावण्यापेक्षा त्यांना आता जाहिरातीचे शेड्युल पूर्ण करणे, महत्वाचे वाटत आहे.
खेळाकडे दुर्लक्ष
भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली की आपण लगेचं त्यांना डोक्यावर घेतो. या गोष्टीचा त्यांना ‘माज’ आलेला दिसतो. तसेच त्यांना आयपीएल आणि जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या ‘अमाप’ पैशामुळे यांचे खेळाकडे सोडून सर्व गोष्टींकडे लक्ष आहे. केंद्रीय कृषीमंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार गेस्ट एडिटर म्हणून झी २४ तासमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी काही खेळाडूंबद्दल गौप्यस्फोट केला होता. त्यांच्यामते, या खेळाडूंकडे पैसा आल्यावर ते ‘बाई-बाटली’ला आपलसं करतात. त्यांचे खेळाकडे दुर्लक्ष होतं. आपल्याला ज्या खेळानं पैसा आणि प्रसिद्धी दिली आहे, त्याची प्रतारणा करण्यावर यांचा भर असतो.
यापूर्वीही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागत होतं. परंतु, हे अर्थकारण पाहिल्यावर तोंडात बोटं घालावंसं वाटतं. पैशासाठी लाखो क्रिकेट रसिकांच्या भावनांशी हे खेळाडू किती दिवस खेळणार हा खरा प्रश्न आहे.
First Published: Friday, March 2, 2012, 17:29