नावात आणि अभिनयातही 'आमिर' - Marathi News 24taas.com

नावात आणि अभिनयातही 'आमिर'

 मंदार मुकुंद पुरकर
 
 
आमीर खानचा नुकताच वाढदिवस झाला. आमीरने नुकतचं ४७ व्या वर्षात पदार्पण केलं. कयामत से कयामत तक हा आमीरचा पहिलवहिला सिनेमा १९८८ साली प्रदर्शित झाला होता. सत्तरच्या दशकात जन्मलेल्या आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माझ्या पिढीच्या डोळ्यात या रोमाँटिक शोकांतिकेने पाणी आणलं होतं. 'पापा कहते है बडा नाम करेगा' .... हे गाणं जणु माझ्या पिढीच्या आशा आकांक्षांचे शब्दरुप होतं. कॉलेजमधली प्रत्येक मुलगी जुही चावला वाटण्याचं ते दिवस होते. असो आता ते दिवस परत येणार नाहीत आणि तेव्हाच्या अनेक जुही आज आपआपल्या संसारात रमल्या असतील.
 
 
आमीरचा पहिलाच सिनेमा हिट झाला. त्याकाळी मुंबई टेरिटरीसाठी या सिनेमाचे हक्क अवघ्या चाळीस लाख रुपयांना विकण्यात आले होते. 'कयामत से कयामत तक'च्या पब्लिसीटीसाठी आमीरने स्वत: रस्त्यावर उतरुन रिक्षा-टॅक्सीना स्टिकर चिकटवले होते असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल.
 
 
 
कयामत से नंतर आमीरचा आलेल्या राखची बॉक्सऑफिसवर राखसुद्धा शिल्लक राहिली नाही. पण या ऑफबीट सिनेमातील आमीरचा अभिनय तगडा होता. त्यानंतर काही टुकार सिनेमे आमीरने तडजोड म्हणून केले खरे पण त्यात त्याचा जीव रमला नाही. त्यानंतरच्या काळात अगदी मोजके आणि वर्षाला एकच सिनेमात काम करण्याचा निर्णय त्याने घेतला.
 
 
'दिल है कि मानता नही' मधला रघु जेटली आणि राजा हिंदुस्थानीतला राजा तसंच रंगीलामधला टपोरी मुन्ना प्रचंड भाव खाऊन गेला. पब्लिकने रंगीलाच्या वेळेस थिएटर डोक्यावर घेण्याचं काय ते बाकी ठेवलं होतं. महेश भटचा 'हम है राही प्यार के' असाच एक लक्षणीय सिनेमा. मनाला स्पर्शणारे अतिशय साधं सोपं कथानक आणि आमीर-जुहीचा नैसर्गिक अभिनयाने आजही हा सिनेमा ताजातवाना वाटतो. आमीर आपल्या कारखान्यात काम करणाऱ्या मुलींना सहकार्य करण्याची विनंती करतो तो सीन आठवून पाहा. आमीरने संयत अभिनयाचं दर्शन घडवत तो सीन विलक्षण उंचीवर नेऊन ठेवला आहे. आमीरने असचं आपल्या अभिनय सामर्थ्याचे दर्शन '१९४७ द अर्थ' या सिनेमात घडवलं आहे. फाळणीवर आधारीत असलेल्या या सिनेमात आमीरने व्यक्तीरेखेत होत जाणारे बदल अतिशय सुक्ष्मपणे टिपले आहेत.
 
 
आशुतोष गोवारीकर आणि आमीर खान यांनी प्रचंड जोखीम उचलत 'लगान'ची निर्मिती केली होती. लगानमध्ये ब्रिटीशकालीन ग्रामीण भारताचे चित्रण होते. ग्रामीण वेशभूषा, हिंदी भाषेचा वेगळा लहेजा अशा सर्व प्रकारचे प्रयोग करण्याचं धाडस या दोघांनी केलं. अर्थात मध्यंतरानंतरचा लगान फक्त दृष्यस्वरुपातचा वेगळा होता त्याचं रुपांतर टिपीकल बॉलिवूडपटात झालं होतं. त्यापाठोपाठ आलेल्या दिल चाहता है या सिनेमाने नव्वदच्या दशकात देशातील मेट्रो सिटीजमधल्या इलाईट क्लासच्या युवा वर्गाचे प्रातिनिधीक चित्रण होते. याचाच अर्थ आमीरने ऐशींच्या आणि नव्वदच्या दशकात तारुण्यात पदार्पण करणाऱ्या पिढीला भावतील अशा भूमिका साकारण्याचे आव्हान लीलया पेललं होतं. याचीच पुनरावृत्ती त्याने थ्री इडियटसमध्येही केली होती. तीन दशकातल्या प्रत्येक तरुण पिढीला आमीर आपला आयकॉन वाटतो हे विलक्षण नाही का.
 
 
आमीर कौटुंबिक समस्यांमुळे चार वर्षे इंडस्ट्रीच्या बाहेर होता, पण त्यानंतर त्याने केतन मेहताच्या मंगल पांडेमधून दमदार कमबॅक केलं. यानंतर आमीरने केलेला प्रत्येक सिनेमात वैविध्य होतं. 'रंग दे बसंती', 'फना', 'तारे जमीन पर', 'गझिनी' आणि 'थ्री इडियटस' हे त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेच, पण त्यातील त्याच्या अभिनयालाही भरभरून दाद मिळाली.
 
आमिरच्या व्यक्तीगत आयुष्याचा विचार करता पहिल्या पत्नीशी विभक्त होतं त्याने किरण रावशी लग्न केलं. मध्यंतरीच्या काळात एका ब्रिटीश महिला पत्रकारासोबतच्या संबंधांची बरीच चर्चा रंगली होती. या महिला पत्रकाराला आमीरपासून मुलही झालं आहे.
 
 
आमीर दिग्दर्शकाच्या कामात ढवळाढवळ करतो असे आरोपही अनेकवेळा झाले आहेत. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या 'पिपली लाईव्ह'च्या गीतकाराला तुंटपुजे पैसे दिल्याने मोठा गहजबही माजला होता.पण तो पब्लिसीटी स्टंट होता का असं माझा मित्र निनाद झारेला वाटतं.
 
 
आमीरने आजवर अनेकवेळा सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळेस मीडियाचा अक्कलहुशारीने वापर करुन घेतला आहे. मीडियातून आपण एक थिकिंग ऍक्टर असल्याची प्रतिमा त्याने लोकांच्या मनात रुढ केली आहे. त्यामुळे आमीर करत असलेली प्रत्येक गोष्ट ही त्याच्या प्रग्लभ विचारांची निष्पत्ती असते असं लोकांना वाटतं. गुलामच्या वेळेस आमीरने स्वत: जीवाचा धोका पत्करत स्टंट केल्याच्या बातम्या मीडियात पेरण्यात आल्या होत्या. कालांतराने हा स्टंट डबलने केल्याचं उघड झालं पण सिनेमा निर्मात्याने तोवर गल्ला गोळा केला होता. 'गझिनी'च्या वेळेस आमीरने आपल्या बेटकुळ्या सॉरी सीक्स पॅक ऍबचा असाच सिनेमाच्या मार्केटिंगसाठी उपयोग करुन घेतला होता. 'थ्री इडियट्स'च्या वेळेस वेशभूषा बदलून आमीरने देशाच्या वेगवेगळ्या भागात भ्रमंती केली होती. इतकचं काय पण लोकांचे केसही त्याने भादरले. मंगल पांडेच्या गेटअपचा उपयोग त्याने टायटनची घड्याळे विकण्यासाठी केला. आपला सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असला की त्याला मीडियाची आठवण होते एरवी मग त्याला त्याची प्रायव्हसी वैगरे जपावीशी असं वाटतं.
 
 
आमीरने बॉलिवूडमध्ये गेली २४ वर्षे टॉपच्या नायकांमध्ये आपलं स्थान राखलं आणि व्यक्तीगत आयुष्यातील चढउतारांचा परिणाम आपल्या कारकिर्दीवर होऊ दिला नाही. सलमान खान हा गोरगरिबांचा नायक आहे तर किंग खानचा ऑरा आणि अपील एनआरआयमध्ये जास्त आहे. आमिर कायम बॉय नेक्स्ट डोअरच राहिला आहे आणि तो तसाच राहो ही अपेक्षा. आमीर खानच्या लगानने ऑस्करपर्यंत मजल मारली होती त्यामुळे भविष्यात ऑस्कर विजेती कलाकृतीची निर्मिती करावी असं मला मनोमन वाटतं.
 
 
 

First Published: Monday, March 19, 2012, 22:41


comments powered by Disqus