Last Updated: Monday, April 9, 2012, 14:08
ऋषी देसाईwww.24taas.com
अवघ्या वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. आठवतेय का? औरंगाबादची ती सभा आठवतेय.. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव याना पोलिसांनी केलेल्या मारहाणप्रकरणी मनसेप्रमुखांची ती विराट सभा.. आठवली ना ! त्याच सभेत मनसे अध्यक्षांनी राष्ट्रवादीला पहिल्यांदाच शिंगावर घेतलं होतं.. आणि येतून सुरु झालेला राष्ट्रवादी विरुद्ध मनसे संघर्ष. अगदी कालपरवापर्यत पुणे-नाशिकच्या महापालिकेपर्यंत सुरु होता.. त्याच सभेतला तो डायल़ॉग आठवतोय ना, सत्या चित्रपटातला.. मौका सभी को मिलता है..
मौका सभी को मिलता है..याच वाक्यानं औरंगबादकरमधल्या मनसे कार्यकर्त्यामध्ये आणि आमदार जाधवानाही काय स्फूरण चढलं होतं.. आठवतंय ना... या सा-याची आठवण होण्याचं कारण म्हणजे आज त्याच आमदार जाधवांची मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर नाराजी. खरतर हा प्रकार मनसेत पहिल्यांदाच दिसतोय...पण या सा-या प्रकारावर आता तटस्थपणे पाहण्याची वेळ आलीय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महानगरातील पक्ष असं काही दिवसांपर्यंत ज्याची संभावना केली जात होती तोच पक्ष आता नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हापरिषद अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत निर्णायक ठरला आहे... जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले आणि राजकिय विश्लेषकांनी मनसेचे उमेदवार म्हणजे महायुतीला मदत असं समीकरण मांडलं होतं.. पण ठाण्यात महायुतीला मनसेनं मदत केल्यामुळं हा पॅटर्न जिल्हापरिषदेतही दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती..मात्र शिवसेनेनं नाशिकमध्ये वेगळी भूमिका घेतली आणि त्यांचा तोच हेकोखोरपणा त्यांना जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत नडला.. मनसेच्या इंजिनानं आपला ट्रॅक राष्ट्रवादीच्या यार्डात वळवला.. हा धक्का केवळ शिवसेनेला होता अस नाही तर कॉंग्रेसलाही होता..

जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी अस सांगणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनसेला पुरोगामी समजत युती केली आणि एकाचवेळी शिवसेना, कॉंग्रेसच्या स्वप्नावर पाणी फिरलं. मनसेच्या शिलेदारानी नाशिकचा वचपा काढायचा ठाम निर्धार करत ठाणे आणि औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीला थेट समर्थन दिलं. औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनसेच्या पाठिंब्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मनसेनं 2 समित्यांचं अध्यक्षपद पदरात पाडून घेत आघाडीला पाठिंबा दिलाय. मनसेच्या या खेळीमुळं शिवसेना-भाजप युतीची गेल्या 10 वर्षांपासूनची सत्ता हातातून गेली आहे.
औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या नईदाबानो फेरोझ या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाताई निकम या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यातं. खरतर ज्या औरंगाबादमध्ये मनसेप्रमुखानी राष्ट्रवादीविरोधात सभा घेत 'मौका सभी को मिलता है', अशा तडाखेबंद संवादानी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हाण दिलं होतं...मात्र त्याच औरंगाबादेत मनसेला राष्ट्रवादीशी युती करावी लागलीय.. पण राजकारणात काहीही होवू शकत याच न्यायानं ठाण्यातही महापालिकेला शिवसेनेबरोबर असणारी मनसे जिल्हा परिषदेत मात्र कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या मदतीला धावलीय. पुणे पॅटर्नवर कायम तोंडसुख घेणारी मनसे पुण्यातही राष्ट्रवादी आणि सेनेच्या मदतीला धावल्यानं तिथ राष्ट्रवादीचा अध्यक्ष विराजमान झालाय.

यवतमाळमध्येही एक अभुतपूर्व चित्र पाहायला मिळालं. सत्तेसाठी कुठलीही युती करणार नाही, असा दावा करणारे राज ठाकरे यांनी माणिकरावांना एकट पाडण्यासाठी पुढे सरसावलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला, भाजपा, शिवसेनाच्या बरोबर राहत सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली. खरतर जिल्हा परिषदाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीवेळी अनेक समिकरण जुळतात.. ती त्या त्या प्रांतानुसार, आणि स्थानिक गणितानुसार योग्यही असतात. पण त्याचे राज्याच्या राजकारणात परीणाम होतचं नाही, असे म्हणयाचे दिवस संपले.. कारण शिवसेनेला पुणे पॅटर्नचे अनुभव अजुनही भोगावे लागत आहेत.. मनसेसमोरचीही आव्हान आता वाढलीयत.. कारण शह काटशहासाठी केलेल्या नव्या युतीवरुन 2014च्या निवडणुकीत विरोधकही मनसेला कोंडीत पडल्याशिवाय़ राहणार नाहीत.
विरोधकांची भूमिका काय असेल हे पाहण्याअगोदर मनसेची स्थलकालपरत्वे बदलेली भूमिका आता तटस्थ नजरेनं कुणीतरी पाहावीच लागेल.. एरवी सा-यानाच शिवसेना बॅकफूटवर जातेय ना मग झालं या शब्दात मनसेवर स्तुतीसुमनं उधळायला आवडतात.. पण आमच्याही काही मनसेकडनं अपेक्षा आहेतच की.. 'मौका सभी को मिलता है' असं म्हणत जनाधार निर्माण करणा-या पक्षातच, त्याच पक्षाच्या आमदारावर 'धोका सभी को मिलता है', असं म्हणण्याची वेळ आलीय. स्थानिक स्वराज्य संस्थाची राजकारण ही स्थानिक पातळीवर चालतात असं जरी क्षणभर मान्य केलं तरी आमदार हर्षवर्धन जाधव हे ही स्थानिकच होते ना.. मग त्य़ांच्या मताला का डावललं गेलं, याचाही विचार करण भाग पडलंय..
नवनिर्माणाच स्वप्न पाहणा-या राज याना बळकटी देणं गरजेचं आहे.. पण त्याचवेळी स्थानिक राजकारणाचे संदर्भही ठाम असण आज गरजेचं बनलय.. औरंगाबादच्या राजकारणात असं काय सोनं होत की ज्यामुळे मनसेला राष्ट्रवादीला मदत करावीशी वाटली.. सत्तेसाठी ठिक आहे. नाशिकचा वचपा.. नाशिकचा वचपा, असं म्हणायला छान आहे.. पण वचपाच्या नादात आपल्याच पक्षाच्या आमदारांला का दुखावलं गेलं याचही भान राखणं गरजेचं होत.. नाहीतर जिल्हापरिषदेत आघाडीला मदत करण्याच्या नादात आपला एक आमदार नाराज झालाय आणि हे चित्र महाराष्ट्रासमोरं जाणं हे खरचं चिंतनीय आहे.
First Published: Monday, April 9, 2012, 14:08