अमरावतीतली पत्रकारिता - Marathi News 24taas.com

अमरावतीतली पत्रकारिता

संतोष गोरे
santosh.gore@zeenetwork.com

20 ऑक्टोबर 2006 ते 4 डिसेंबर 2007 या जवळपास सव्वा वर्षाच्या काळात मी अमरावतीत पत्रकारिता केली. हैदराबादहून माझी इथं रिपोर्टर आणि ब्युरो चीफ या पदावर बदली ( बदली म्हणजे शिक्षा नव्हे ) करण्यात आली. हैदराबादून फिल्डवर येण्यासाठी मोठं लॉबिंग करावं लागायचं, तसंच कोणत्यातरी गटाचा कपाळावर ( कुंकू नव्हे ) शिक्का मारावा लागायचा. मात्र या पैकी कोणताही प्रयत्न न करता माझी अमरावतीसाठी निवड झाली होती. याचा माझ्यासह अनेकांना धक्का बसला होता. अर्थात कोणतंही राजकारण न करता, बदल घडवता येतात, हे यातून तेव्हा दिसून आलं. एक प्रकारे डेस्कवर कोणत्याही राजकारणात न राहता अलिप्त राष्ट्रांप्रमाणे आगेकूच करणा-या विचारसरणीचा तो विजय. आता तुम्ही म्हणाल साधी बदली पण काय कौतुक ? आता आपलं कौतुक आपणच करण्याचे हे दिवस आहेत. त्याला काय करणार ?
 
अर्थात मी मागितलं होतं संभाजीनगर, मात्र मला मिळाली अमरावती. असा हा प्रकार घडला होता. नाही तरी जे मागितलं ते मिळण्याऐवजी दुसरंच पदरी पडण्याचा दोषच माझ्या मागे लागला आहे. अर्थात हा दोषही दूर होईलच. थोड्याशा नाराजीनं मी अमरावतीमध्ये प्रवेश केला. वडाळी भागातल्या आमच्या ऑफिसमध्ये मी सकाळी पोहोचलो. तिथं माझी आणि प्रफुल्ल साळुंखेची भेट झाली. कॅमेरामन आशिष यावले, कृष्णा भागबोले आणि मिलिंद वाडे ही आमची तिथली टीम. तर अमरावतीच्या ब्युरोमध्ये माझ्याबरोबर उमेश अलोने, सत्यपाल घाटे, दिनेश पवार, आशिष मलबारी हे रिपोर्टर अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिममध्ये काम रिपोर्टिंग करत होते.
 
 
मी आणि कॅमेरामन आशिष यावले ही जोडीही अफलातून होती. शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीचं दृश्य आम्ही दोघे बरोबर असताना कुणाच्याही डोळ्यासमोर यावं, अशी आमच्या दोघांची उंची
 
 
कोणत्याही एजंटची मदत न घेता आणि डिपॉझिट न देता घरही भाड्यानं मिळालं. संजीवनी कॉलनीत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आमच्या शेजारी. अँडव्हेकोट अनिल कडू यांचा मी भाडेकरू. तसंच शेजारी असलेल्या राऊत कुटुंबाबरोबरही चांगलाच जिव्हाळा निर्माण झाला होता. अर्थात याचं कारण माझे तेव्हा दोन महिन्यांचा असणारा माझा मुलगा वेद. कडू आणि राऊत कुटुंबात छोटं मुल नसल्यानं वेद चांगलाच लाडोबा झाला होता. घरापासून दूर असलो तरी त्याचं घरच्यासारख कोडकौतुक तिथं सुरू असायचं. त्यामुळे स्टोरीसाठी बाहेरगावी मुक्काम असला तरी पत्नी आणि मुलाची चिंता करावी लागत नव्हती.
 
 
बहुतेक 2006 च्या डिसेंबरमध्ये दर्यापूरची पोटनिवडणुक झाली. प्रचाराच्या काळात मला एका प्रतिस्पर्धी चॅनेलमधील रिपोर्टरचा फोन आला. तुझं पाकीट तयार आहे, ते घेण्यासाठी ये. हा फोन ऐकून मी हारलो, मात्र ही कामं मी करत नाही असं त्याला सांगितलं. तत्कालीन महापौरांनी ही पाकीटं पोचती केली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आई - वडिलांनी केलेल्या उच्च संस्कारांपुढे अशी पाकीटं कधीही उभी राहू शकत नाहीत. मात्र या घटनेमुळं राजकीय वर्गात चांगली इमेज निर्माण झाली. ( अर्थात इमेज आधीपासून चांगलीच होती. ) मात्र प्रतिस्पर्धी चॅनेलमधले अनेक सहकारी मेळघाटमध्ये जाऊन तर कुणी अधिका-यांना ब्लॅकमेल करायचे. काहींना तर टोल नाक्यावाले नियमीत हप्ता देत होते, अशाही खबरा कानावर यायच्या.
 
 
मात्र या बजबजपुरीतही मोहन अटाडकर, अविनाश दुधे, सध्या मुंबईत असलेले रघुनाथ पांडे, प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर या पत्रकार आणि संपादकांचा अभ्यास मनाला भावला. त्यांचा विविध विषयातला अभ्यास नवख्या पत्रकारांना नक्कीच प्रेरक ठरणारा आहे.
 
 
तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम  यांचा यवतमाळमध्ये शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला होता. त्यानंतर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पहिला जाहीर सत्कार अमरावतीमध्ये झाला होता. असा हा शेवट आणि आरंभ कव्हर करण्याची संधी मला मिळाली. खैरलांजीच्या घटनेचे उमटलेले हिंसक पडसाद कव्हर करताना चांगलीच दमछाक झाली होती. या काळात पीएम पॅकेजची अधिका-यांनी कशी वाट लावली, याच्या बातम्या कव्हर करण्यासाठी मी आणि आशिषनं शर्थ केली होती. शेतकरी आत्महत्येनंतर सरकारवर टीका करणारी बातमी आम्ही प्रकर्षानं देत होतो. मेळघाटसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्टोरी करून शेतक-यांना न्याय कसा देता येईल ? हाच प्रश्न आमच्या मनात असायचा. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही वेगळाच अनुभव देणा-या ठरल्या.
 
 
पुराची बातमी कव्हर करण्यासाठी मी, आशिष यावले, कृष्णा लोखंडे, राजेश सोनोने, सत्यपाल गेलो होतो. आमच्या गाडीची जवळपास पाणी जमू लागलं होतं. कृष्णा लोखंडेने धोका ओळखून तिथून गाडी दुसरीकडे न्यायला लावली. थोड्याच वेळात तिथं मोठा लोंढा आला. मात्र आम्ही त्यातून थोडक्यात बचावलो. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी भापकर यांनी बचावपथक पाठवून पत्रकारांची सुटका केली होती.
 
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते दौ-यावर आले की, पत्रकारांच्या अंगावर काटा उभा रहायचा कारण नेत्यांच्या पुढेपुढे करणा-या कार्यकर्त्यांमुळे पत्रकारांची दाणादाण उडायची. त्या तुलनेत शिवसेना - भाजप युतीच्या नेत्यांचा कार्यक्रम शिस्तबद्ध असायचा. या मुळे आघाडी आणि युतीतल्या नेत्यांच्या वागणुकीचा तुलनात्मक अभ्यासही करता आला. नाही तर मास कम्युनिकेशनला 'कन्टेन्ट अँनालेसिस'वर मी लघुप्रबंध सादर केला होता. त्याचं प्रॅक्टीकल अमरावतीमध्ये पुन्हा एकदा करायला मिळालं.
 
 
अमरावतीमधली सांबरवडी आणि कचोरीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. सांबरवडी म्हणजे कोथंबिर वडी. सुरूवातीला मला वाटलं की, इडली बरोबरच्या सांबरमध्ये एखादी वडी देत असावेत. या आठवणींबरोबर पत्रकारितेतल्या अनेक आठवणी मनात ताज्या आहेत. अर्थात पत्रकारितेतला 'अर्थ' अमरावतीत जवळून कळाला. अनेक पत्रकारांना तिथं दुकान म्हटलं जायचं. मात्र मुंबईत आल्यावर तर पत्रकारितेतली दुकानं नव्हे तर 'मॉल' पहायला मिळाले.

First Published: Monday, April 23, 2012, 16:50


comments powered by Disqus