Last Updated: Sunday, June 23, 2013, 10:05
www.24taas.com, शुभांगी पालवे, झी मीडिया यंदा पावसाला थोडी लवकरच सुरुवात झालीय. आपसुकच ट्रेकरर्सच्या उत्साहाला आणि प्लानिंगलाही.... पाऊस कोसळून धरणीच्या कुशीत शिरतोय आणि निसर्गवेडे बाहेर पडण्यासाठी आसुसलेत. पण, ‘टाईम मॅनेजमेट’... ही मुंबईकरांना कधीही न चुकलेली अन् कधीही न जमलेली एक गोष्ट आडवी येते आणि सगळंच मागे पडतं... मात्र, ऑफिस, कुटुंब आणि घरातली इतर कामं यातून एक दिवस मिळणारी सुट्टी भटकण्यात घालवणारे मुंबईकर आहेतच की... अशाच मुंबईकरांसाठी आम्ही माहिती देत आहोत मुंबई-ठाण्या-पुण्याच्या जवळपासच्या ‘विकेन्ड डेस्टीनेशन्स’ची... जिथे तुम्ही तुमचा एक दिवस तुमच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि पावसासोबत मस्त मजेत घालवू शकता. भूपतगड, जव्हार खरं तर मुंबईपासून अगदी जवळ (जवळपास 150 किलोमीटर) लांब असणारा वाडा-मोखाडा-जव्हार हा भाग आदिवासी पाड्यांमुळेच ओळखला जातो. यातूनही मोक्याच्या ठिकाणाहून (वाडा, जव्हारच्या मार्केटपासून) थोड्या दूरवर असणारे छोटे छोटे पाडे तर तुम्हाला या भागाची परिस्थिती लक्षात आणून देण्यासाठी पुरेशी आहेत. मीठ-मिरचीसाठीही 20 किलोमीटर लांब जव्हारला चालत जाणारी फाटकी माणसंही तुम्हाला इथं मिळतील. पण, हो जर इथं तुम्हाला काही मदत लागलीच तर विचारायला अजिबात कचरायची गरज नाही. त्यांच्याकडे जेवढं करण्यासारखं आहे तेवढं ते तुमच्यासाठी मनमोकळेपणानं करतील.
पोहचणार कसं? गुगलवर संपूर्ण नकाशा पाहण्यासाठी पुढील लिंकवर कॉपी करून दुसऱ्या विंडोमध्ये ओपन करा - http://goo.gl/BUjKm मुंबई-ठाणेकरांना तर अगदी एका दिवसात जाऊन येण्यासारखा हा अतिशय दुर्गम भागातील (आजही हा भाग दुर्गमच म्हणावा लागतो) किल्ला आहे. तुमचं वाहन असेल तर इथं पोहचण्यास फार कष्ट पडणार नाहीत. नसेल तर जव्हारहून एसटी किंवा रिक्षा तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या ‘चिंचवाडी’ या गावापर्यंत सोडू शकते.
मुंबईहून स्वत:च वाहन घेऊन निघाला असाल तर मुंबई – ठाणे – भिवंडी – वाडा – मलवाडा – वाकी – आणि वाकीनंतर मेढे रोड (विक्रमगड – जव्हारच्या अगोदर एक फाटा उजवीकडे जातो, तो मेढे रोड) घेऊ शकता. हाच रस्ता शिवाजीनगरहून तुम्हाला चिंचवडला पोहचवतो.
किंवा तुम्हाला जव्हारहून जायचं असेल तर मुंबई – ठाणे – भिवंडी – वाडा – मलवाडा – वाकी नंतर विक्रमगड-जव्हार हा रोड घेऊन तुम्ही अगोदर जव्हारला पोहचू शकता. जव्हारहून चिंचवाडीकडे जाताना तुम्हाला 16-17 किलोमीटरवर तुम्हाला ‘झाप’ हे गाव लागलेत.
चिंचवाडीपर्यंत डांबरी रोड आहे. चिंचवाडीमध्ये पोहचल्यानंतर गड चढायला सुरुवात करू शकता. हा गड चढायला अगदी सोपा आहे. अर्ध्या तासात तुम्ही किल्ल्याच्या पडक्या दरवाजापर्यंत पोहचू शकता.
भूततगडावर शिल्लक राहिलेल्या अवशेषांमध्ये पडके दरवाजे (उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा), बुरुज, पाण्यासाठी दगडांची खेदीव टाकी, एक तलाव (पावसाळ्यात भरलेला दिसू शकतो) आणि आजूबाजूचा परिसर दिसतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा परिसर दिसतो.
आणखी काय? Ø वाडा - जव्हारला जाताना रस्त्याच्या आजुबाजुचा परिसर, निसर्ग आणि त्यात पाऊस.... लाजवाबच म्हणायला लागेल. खरंच या रस्त्यावरचा प्रवास तुम्ही मनापासून एन्जॉय करू शकाल.
Ø वाड्याला किंवा जव्हारला तुम्हाला छोटी-मोठी हॉटेल्स मिळतील. पण त्यानंतर मात्र कठिण आहे. खाण्याचे पदार्थ जवळ बाळगलेत तर उत्तम...
Ø वेळ असेल तर जव्हारचा राजवाडा पाहायला जाऊ शकता.
Ø जव्हारमध्येच ‘हनुमान पॉईंट’, शिर्पाचा माळ ही ठिकाणंही पाहून येऊ शकता.
Ø जव्हारच्या जवळच दाभोसा धबधबा आहे.
First Published: Sunday, June 23, 2013, 08:49