Last Updated: Wednesday, March 21, 2012, 10:14
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबादमध्ये शिवसेना, भाजप आणि मनसेनं एकत्र यायला हवे, असे आवाहन भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केले आहे. मनसे आणि शिवसेनेनं भविष्यात एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. मनसे हा वेगळा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्यापेक्षा युतीसोबत यावं अशी अपेक्षा मुंडेंनी व्यक्त केली आहे. औरंगाबादबाबत विचार घेण्यासाठी अजूनही अवघी असल्यानं मनसेनं सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन गोपीनाथ मुंडेंनी केले आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे १६ तर राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. त्यामुळं केवळ दोन सदस्यांचा आघाडीला पाठिंबा मिळाल्यास त्यांची सत्ता येणार आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्यता असली तरी ८ सदस्य असलेल्या मनसेची राष्ट्रवादी बरोबर बोलणी सुरु आहेत. त्यामुळं नवा औरंगाबाद पॅटर्न अस्तित्वात येणार काय, याची चर्चा सुरु झालीय. याखेरीज ६ सदस्य असलेल्या भाजपचे दोन मते फुटल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक १७ जागा आहेत. मात्र संख्याबळ पाहता आघाडीला सत्तेची संधी अधिक आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेवरशिवसेनेची दहा वर्षांची सत्ता संपुष्टात येणार आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या होत्या. परंतु त्यांचे गणित नाशिकमधील घडामोडीवर अवलंबून होते. सेनेने मनसेला धोका दिला. ठाण्यात मनसेने शिवसेना-भाजप युतीला मदत केली होती. त्यामुळे नाशिकमध्ये सेनेने सहकार्य करण्याची अपेक्षा होती. मात्र, सेनेकडून तसे न झाल्याने गोपीनाथ मुंडेच्या प्रतिसादाला मनसे किती गांर्भीयाने घेते, याकडे लक्ष लागले आहे.
First Published: Wednesday, March 21, 2012, 10:14