Last Updated: Thursday, December 29, 2011, 13:35
उद्धव ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष‘चांगल्या-वाईट गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतात. राजकारणातही तेच आहे. तिथे जशी वाईट माणसे आहेत तशी चांगली माणसेही आहेत. पण सरसकट सर्व राजकारण्यांची यथेच्छ टवाळी केली जाते. हात उचलण्यापर्यंत लोकांची मजल जाते. राजकारण्यांचा इतका राग येतो, मग पुन: पुन्हा तेच सरकार निवडून कसे येते? ते सरकार बदलण्याची ताकद दाखवली पाहिजे.
‘राणे-जाधव’ एन्टरटेनमेंटमध्ये टाका!
राणे-जाधव यांच्यातील वर्चस्वाच्या लढाई कोंबड्यांची झुंज आहे. त्यांची बातमी एन्टरटेनमेंटमध्ये टाकायला हवी. कारण त्यांच्या शक्तिप्रदर्शनाचा लोकांना काहीही उपयोग नाही. त्यांच्यात इतकी ताकद आहे तर जैतापूरवासियांच्या मागे का उभी करत नाहीत. ते कोकणचेच आहेत ना! आपण कुणाला मोठे केले याचा विचार आता लोकांनीच करायला हवा.’ .
ते शिवसेनेत असते तरी खूप काही मिळाले नसतेशिवसेना सोडून गेलेले सगळेजण आजही आपल्याबरोबर असते तर शिवसेना आणखी मोठी झाली असती असे अजिबात वाटत नाही. कारण शिवसेनेपेक्षा मला काय मिळेल हाच विचार करणारी ती माणसं होती. ती आता जिथे आहेत तिथेही काय मिळेल हेच ते पाहताहेत. त्यामुळे ते असते तर शिवसेनेला आतापेक्षा फार काही मिळालं नसतं.’
आम्ही माणुसकी सोडलेली नाही
ठाकरे आणि पवारांच्या दुसर्या पिढीतील वाद टोकाला गेले आहेत. हे मी मान्य करतो. राजकारण म्हणून आम्ही धोरणावर टीका करीत असलो तरी माणुसकी सोडलेली नाही. एखाद्या व्यक्तीचं वाईट व्हावं ही घाणेरडी, नीच प्रवृत्ती आमची नाही. पण त्यांनी बापजादे काढले की उत्तर देणं भाग आहे. त्यांची टगेगिरी आम्ही चालू देणार नाही, असे टगे आम्ही खूप पचवलेत.’
राजकारणात आल्याचा पश्चात्ताप नाही
राजकारणात उगाच आलो असं कधी वाटलं नाही कारण इथे येऊन तुम्ही लोकांना काय देता ते महत्त्वाचं आहे. मी त्याचा विचार करतो आणि महापालिकेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे ते देण्याचा विचार करतो, असे सांगून, ‘मुख्यमंत्रिपद वगैरे सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत. ती स्वप्ने घेऊन मी जगत नाही. राजकीय नेता म्हणून होणार्या टीकेचा राग येत नाही. पण ती टीका चुका दाखविणारी असावी. केवळ ओरबाडणारी नसावी. टीकाकाराकडेही अक्कल हवी
‘त्या’ महिलेकडे कार्यकर्ती म्हणून पाहा
महिला आरक्षणामुळे सर्वच पक्षांच्या पदाधिकार्यांच्या पत्नींचे पोस्टर लागलेले दिसतात, या बाबत बोलायचे झाले तर ‘शिवसेनेने अनेकदा खुल्या वॉर्डातही महिलेला उमेदवारी दिली आहे. तसेच प्रत्येक निवडणुकीला ५० टक्के उमेदवार बदललेत. यावेळीही ते होऊ शकतं. पण प्रत्येक वेळी एखाद्या महिलेकडे एखाद्याची पत्नी किंवा मुलगी म्हणून न बघता कार्यकर्ती म्हणून पाहायला हवं. पदाधिकार्यांच्या पत्नीही चांगली कामे करत असल्याची अनेक उदाहरणं आहेत.’
महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठीच दिल्लीत
‘यंदा शिवसेनेच्या खासदारांनीच संसदेत आणि बाहेर शेतकर्यांची भूमिका मांडली. यापुढेही मांडणारच. महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठीच आम्ही दिल्लीत जातो. पण इतर पक्ष मूग गिळून का बसतात?’
शिवसैनिकांना परीक्षेची गरज नाही
‘गुणवत्ता असेल तर सिद्ध करावी लागत नाही ती आपोआप दिसते. वामनराव महाडिकांसारख्या शिवसेनेच्या खासदाराने कोणत्याही परीक्षेशिवाय आपली विद्वत्ता दाखवून दिली होती. मनोहर जोशी यांच्यासारखे शिक्षक महापौर, खासदार झाले. संसद गाजवितानाच रस्त्यावर उतरणारा आमचा शिवसैनिक आहे. अशा शिवसैनिकांना निवडणुका लढविण्यासाठी कुठल्याही परीक्षेची गरज नाही.
मुंबई, ठाणे शिवसेनेचेच
मुंबई, ठाण्याचे बालेकिल्ले आम्ही यापुढेही राखणारच, पण यावेळी पिंपरी-चिंचवडवरही स्वारी करू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या विकासकामांची तुलना करा. मग शिवसेनेचे काम कळेल. संकटाच्या प्रत्येक क्षणी शिवसैनिक मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरला आहे. प्रसंगी प्राणही दिले आहेत. मुंबईतील एका बॉम्बस्फोटानंतर शिवसैनिकांना रक्तदान थांबविण्याची विनंती डॉक्टरांनी केली होती. इतके शिवसैनिक रक्तदान करीत होते. मुंबईशी हे रक्ताचं नातं कुणी तोडू शकत नाही.
शह देण्यासाठी समोर शहेनशहा पाहिजे
नारायण राणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने शिवसेनेत येत आहेत. राणेंना शह देण्यासाठीच त्यांना प्रवेश अजिबात दिला जात नाही. शह देण्यासाठी समोर ताकदीचा शहेनशहा असावा लागतो,
...तर साहेब माफ करणार नाहीत
‘राजकारणात आपला एखादा निर्णय फार चुकला असे अजून तरी वाटत नाही. कारण आजही सगळे निर्णय शिवसेनाप्रमुखांच्या संमतीनेच होतात. माझ्याकडून शिवसेनेबाबत काही चूक झाली तर शिवसेनाप्रमुख मला माफ करणार नाहीत. त्यामुळे चूक होऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे.
बायकामुलांना घेऊन अजित पवार जैतापुरात जातील का!
शिवसेनेने कितीही विरोध केला तरी जैतापूर प्रकल्प करणारच असे सांगणार्या अजित पवारांनी एक लक्षात ठेवावे. ‘जैतापूरला आमचा विरोध आहेच. तरीही आम्ही परिसंवाद घेऊन दोन्ही बाजू समोर आणल्या. त्याच्याकडे कसे बघायचे हा प्रत्येकाच्या वकुबाचा प्रश्न आहे. अजित पवारांना बारामतीत राहायचं आहे. जैतापुरात लोक मेले तरी त्यांना फरक पडत नाही. हेच अजित पवार आपल्या बायकामुलांना घेऊन जैतापुरात राहायला जातील का?
First Published: Thursday, December 29, 2011, 13:35