Last Updated: Saturday, May 18, 2013, 18:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचा ‘ये जवानी है दीवानी’ हा सिनेमा ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनासाठी आलेल्या रणबीरला मीडियाशी बोलताना काही प्रश्न आवडले नाहीत त्यामुळे तो चांगलाच संतापला...
झालं असं की... रणबीरला एका पत्रकारानं ‘तुमच्या दोघांच्या पूर्व नात्याचा परिणाम या सिनेमात काम करताना झाला का?’ असा प्रश्न विचारला होता. यावर रणबीरनं लगेचच उत्तर दिलं, की ‘मला माझ्या खाजगी जीवनाबद्दल प्रश्न विचारलेले अजिबात आवडत नाही तुम्ही फक्त माझ्या सिनेमांविषयीच बोला. जो मला माझ्या खाजगी जीवनात ढवळाढवळ करतो त्याची आब राखणं मला जमत नाही’. रणबीरला बॉलिवूडमध्ये दाखल होऊन आता पाच वर्षांहून अधिक काळ झालाय त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल जीवनावर आधारितच बक्कळ प्रश्न त्याला विचारले जाऊ शकतात.
एव्हढं बोलून तो थांबला नाही. तो म्हणतो, ‘मी पण तरुण आहे आणि रोमांस करणं हा माझा अधिकार आहे. त्याचं तुमच्याशी काही एक देणं-घेणं नाही. मी तर तुम्हाला कधी विचारत नाही की काल रात्री तुम्ही तुमच्या पत्नी बरोबर काय खाल्लं होतं? किंवा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडबरोबर कुठे डिनरसाठी गेला होतात?’
रणबीरला सोशल नेटवर्किंग साईटसही त्यामुळे जास्त पसंत पडत नाहीत. तो म्हणतो, ‘मी एक कलाकार आहे आणि मला वाटतं की एका कलाकाराला केवळ सिनेमांद्वारेच आपल्या चाहत्यांशी संवाद साधायला हवा.’
‘जुन्या जमान्यात दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चनसारख्या स्टार्सची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ होती कारण त्यांचं दिसणं फारच दुर्मिळ होतं. पण आज मात्र, एक कलाकार सिनेमांमध्ये, छोट्या पडद्यावर, जाहिरातींत आणि सोशल नेटवर्किंग साईटवर दिसतात. त्यामुळे लोक या कलाकारांकडून लवकर बोअर होतात’ असंही रणबीरला वाटतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 18, 2013, 18:43