होळीची विविध रुपं ! Nation wide Holi celebration

होळीची विविध रुपं !

होळीची विविध रुपं !
www.24taas.com, मुंबई

सुमारे ३०० वर्षापासून सुरु असलेली अमरावतीची होळीही महाराष्ट्रातली एक वेगळी होळी म्हणून ओळखली जाते. अमरावतीची कुलस्वामिनी श्री अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिरासमोर होळीला दहन करण्यात येणारा हेटा हा श्रद्धेचा आणि पंरपरेचा सोहळा म्हणून पाहिला जातो..

महाराष्ट्रात होळीचा उत्सव ठिकठिकाणी वेगवेगळ्या रुढी पारंपरेनुसार साजरा केला जातो.. अमरावतीची ही होळी अशीच एक वैशिष्ठ्यपुर्ण म्हणून ओळखली जाते.. या होळीला सुमारे ३०० वर्षांची पंरपरा आहे.. अमरावतीची कुलस्वामिनी श्री अंबादेवी आणि एकविरा देवीच्या मंदिरासमोर ही होळी पेटवली जाते.. आपल्यावर कोणतही संकट येवू नये यासाठी श्रद्धाळू देवीला साकडे घातात ..अमरावतीतील या होळी उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे होळीच्या एक महिना आधी हेट्याचे झाड लावण्यात येते. त्याला श्रीफळ बांधून लोक नवस करतात.. आणि होळीच्या दिवशी हेट्याच्या झाडाचं पुजन करुन दहन केले जातं..


अंबादेवीच्या मंदिरासमोर हेट्याचे झा़ड लावण्यापूर्वी त्या जागेची पुजा करण्यात येते. त्यानंतर होळीच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.. पारंपारिक पद्धतीनं साजरा करण्यात येणारा अमरावतीचा होलिकोत्सव भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे..



राज्यभरात होळी आणि रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली तरी मुबलक पाणी असणा-या कोकणात मात्र होळीचा उत्साह काही वेगळाच असतो.. शिमगोत्सव म्हणून ओळखल्या जाणा-या या सणाकराता चाकरमानी खास आपल्या गावी कोकणात जातो.. तर गोव्यात शिमगोत्सवाचा सोहळा काही औरच असतो..


कोकणात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.. ग्रामदेवतेचा पालखी आणि ग्रामसोहळा यामुळे चाकरमानी मोठ्या प्रमाणात या उत्सवात सहभागी होतो.. रत्नागिरीत होळीच्या निमित्तानं ग्रामदेवतेचा पालखी सोहळा हा पाहण्यासारखा असतो.. ग्रामदेवतेची जड अशी पालखी नाचवण्याची कला आजही जोपासली जातेय. ढोलाच्या ठेक्यांवर पालखी नाचवली जाते..



पालखी सोहळ्याप्रमाणेच शिमगोत्सवाचे खेळही प्रसिद्ध आहेत..वयोवृद्धांचा काटखेळ, नटवा म्हणजे संकासूराचा खेळ हा लहान मुलांचे मनोरंजन करतो. तर पुरुष मंडळीनी स्त्रीचा वेष धारण करुन केलेला गोमूचा नाचही प्रसिद्ध आहे..

रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्गाताही होळीच्या सणाला सुरुवात झालीय. पारंपरिक पद्धतीनं साज-या होणा-या कोकणातल्या होळीला चाकरमान्यांचंही आगमन झालंय. संध्याकाळी चारनंतर गावागावात हुडा उभा करण्यासाठी धावपळ सुरू होते. कोकणातल्या होळीच्या हुड्याजवळ जाऊन भाविक दरवर्षी नवस बोलतात. हे नवस नंतर फेडले जातात. नवस बोलणं आणि फेडणं यासाठी आज गावागावात गर्दी झाली होती. हा उत्सव पाच दिवस चालतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या होळी उत्सवाला शंभर-दोनशे वर्षांपूर्वीती पंरपरा आहे. यावर्षीच कोकणातील होलिकोत्सवातील वैशिष्ट्य म्हणजे अनेकांनी वृक्ष तोडीला छेद दिलाय.

आगळ्या वेगळ्या आणि सास्कृतिक वैभव असणा-या गोव्याच्या शिमगोत्सवाला सुरुवात झालीय.. गुलाल उधळून गोवेकरांच्या होलिकात्सवाला प्रारंभ होतो. ग्रामदेवतेची ओटी भरल्यानंतर ढोलताशांच्या गजरात मिरवणूक निघते. पारंपारिक लोकनृत्यांनी ही मिरवणूक सजलेली असते. गोवेकरांच्या जोडीनेच परदेशी नागरिकही या शिमगोत्सवात रंगून जातात.. एकूणच रत्नागिरी, सिंधुदुर्ग बरोबरच गोमांतकातही शिमगोत्सवाच्या उत्सवात सारेच न्हावून निघालेत.

आदिवासी संस्कृतीत होळी उत्सवाला सर्वाधिक महत्व आहे. होळी निमित्त सर्व आदिवासी बांधव आपल्या घराकडे परततात.. सर्वचजण या उत्सवात रंगून जातात.. तब्बल एक आठवडा चालणा-या या नंदूरबारच्या होळी उत्सवाची सुरुवात झालीय.. त्यामुळे सारा आसमंत आता लोकमंम ढोल आणि घुंगराच्या आवाजानं निनादून गेलाय..

होळीच्या उत्सवात बुलडाण्याच्या सैलानी बाबाच्या यात्रेस सुरुवात झालीय.. सैलानी बाबांची यात्रा ही राज्यभरात प्रसिद्ध असून महिनाभर चालणा-या या यात्रेस देशभरातून लाखो भक्त येत असतात..या होळीचं वैशिष्ट्य म्हणजे होळीत नारळ, लिंबू, आणि बिब्बे टाकले जातात..

बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथे अब्दूल रहेमान मुज्जर्द रहेमतुल्ला अलैह उर्फ सैलांनी बाबांचा दर्गा आहे. याठिकाणी साजरी केली जाणारी होळी जरा वेगळी आहे... नारळ, लिंबू आणि बिब्ब्याला खिळे टोचून ते होळीला अर्पण केले जातात..ही होळी मनोकामना पूर्ण करणारी असल्याचा लोकांची लोकांची श्रद्धा आहे..त्यामुळेच या ठिकाणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात लोक होळी साजरी करण्यासाठी येतात..या होळीची राख भाविक प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात..


यंदा या होळी उत्सवावर र दुष्काळाचे सावट आहे. यापार्श्वभूमीवर यावर्षी केवळ दर्शन यात्रा भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मनोरंजन कार्यक्रमाला यंदा फाटा देण्यात आलाय....

या अनोख्या होळीला जवळपास दहा ट्रक नारळ, लिंबू आणि कपडे अर्पण करण्यात आलेत.. देशातली सर्वात मोठी होळी म्हणून सैलांनी बाबांची होळी प्रसिद्ध आहे.. या होळीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असल्यानं ही होळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक बनली आहे..

First Published: Thursday, March 28, 2013, 00:08


comments powered by Disqus