पावळेचा पाणी पाष्टाक !

पावळेचा पाणी पाष्टाक !
ऋषी देसाई, झी 24 तास

कोकणभूमी ही अतर्क मानली जाते. या मातीने नेतृत्व निवडताना केवळ निवडून दिलं नाही तर त्या नेतृत्वाला बालेकिल्ला बनवण्याचेही स्वातंत्र दिलं. नाथ पै- दडवंतेपासून ते अगदी नारायण राणेंपर्यत नेतृत्वाला सरजांमदार नाही ते राजा बनवणारा हा भूभाग. यावेळच्या लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार डॉ. नीलेश राणेंचा पराभव करत सेनेच्या विनायक राऊतांनी एक लाख पन्नास हजारांची एक्कावनची दक्षिणा देत हा गड युतीला बहाल केला. नीलेश राणेंचा गेल्या पाच वर्षातला प्रत्येक गावातला संपर्क, कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांचे जाळे याउलट विस्कळीत झालेली शिवसेना, मोजकेच कार्यकर्ते, मतदानादिवशी काही ठिकाणी तर सेनेची टेबलही नव्हती.. तरीपण हा चमत्कार घडला.. कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !
पावळेचा पाणी पाष्टाक !


लोकसभा निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाली आणि चिपळूणपासून ते बांद्यापर्यंत भगवे झेंडे आणि फटाक्यांनी वातावरण दुमदुमून गेले. नीलेश राणे यांना या निवडणुकीत ३,४३ हजार ३७ मत मिळाली तर शिवसेनेचे विनायक राऊत यांना ४ लाख ४३ हजार ८८ मत मिळाली. या निवडणुकीत सेनेचे डिपॉझीट जप्त करून दोन लाखानी काँग्रेसचा विजय होईल, असे दावे करण्यात येत होते. पण प्रत्यक्षात मात्र शिवसेनेनं १ लाख ५० हजार ५१चे मताधिक्याने घवघवीत विजय मिळवलाय. राऊतांचा हा विजय केवळ सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांसाठीच नाही तर संपूर्ण कोकणासह मुंबईतल्या शिवसैनिकांनाही संजीवनी देणारा ठरलाय.

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाने यावेळी बालेकिल्ल्यावर पुन्हा शिवसेनेने आपला भगवा घट्ट रोवलाय. राणेंचा गड असणा-या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी विद्यमान खासदार नीलेश राणे यांना पराभव सहन करावा लागलाय.

विद्यमान उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नीलेश यांनी कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत उमेदवारी पटकावून स्वत:चा विजय नक्की केला होता. शिवसेनेनही गत उमेदवार सुरेश प्रभू यांना उमेदवारी नाकारून विनायक राऊत यांना उमेदवारी दिली होती. मधल्या काळात जैतापूर, वेगवेगळे प्रकल्प, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष, राणे विरुद्ध जुने काँग्रेस, राणे विरुद्ध केसरकर, राणे विरुद्ध शिवसेना असे वेगवेगळे संघर्ष झडत गेले. नारायण राणेंनी वेगवेगळ्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकीत आमदार विजय सावंत, आमदार दीपक केसरकर त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, स्थानिक नेते पुष्पसेन सावंत, आमदार राजन साळवी, आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी थेट विरोधाची भूमिका स्विकारली होती. मागच्या निवडणुकीत सर्वजण हातात हात घालून लढूनही नीलेश राणेंना केवळ सुमारे 48 हजाराचे लिड मिळाले होते. यावेळी परिस्थीती पूर्णपणे बदलली होती. भास्कर जाधवांपासून ते थेट दीपक केसरकर सारेच राणेंच्या विरोधात होते. त्यात दीपक केसरकराची नाराजी ही उटांचा पाठीवरची काडी ठरली आणि जिल्ह्यात राजकिय उद्रेक पेटला. अनेक दिवस धूसमुसणा-या राजकीय असंतोषाला केसरकरांच्या रुपाने चेहरा मिळाला.. आणि शिवसैनिकाचा असंतोष, समाजवादी मताचा चेहरा आणि अंहिसावादी नेतृत्वा अशा सगळ्याच मताची मोट बांधली गेली.आणि गेल्यावेळी 48 हजाराचे लीड राखणे सोडाच यावेळी दीड लाखाचा पराभव पाहण्याची नामुष्की काँग्रेसवर आलीय.
पावळेचा पाणी पाष्टाक !


मतमोजणीपूर्वी फक्त सावंतवाडीत फटका बसेल असा अनेक राजकिय विश्लेषकांचा होरा होता, पण प्रत्यक्षात विभागवार मतमोजणीचे आकडे आले आणि सगळ्यांनाच धक्का बसत गेला. सावंतवाडी मध्ये नीलेश राणेंना 47365 तर राऊतांना 88986 मते मिळाली. कुडाळ मालवण या नारायण राणेंच्या मतदारसंघात काँग्रेसला 52240 मते तर सेनेला 74123 मते मिळाली. कणकवली देवगडमध्ये फार मोठा चमत्कार होईल अशी आशा होती. पण प्रत्यक्षात मात्र शिवसेनेला 72641 आणि कॉंग्रेसला 71264 मते मिळाली. जैतापूर प्रकल्पाचा समावेश असलेल्या राजापूर मतदारसंघात राणेंना 55569 तर राऊतांना राऊतांना 77884 मते मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या उदय सामंताच्या रत्नागिरी मतदार संघात शिवसेनेच्या राऊतांना 94134 मते तर राणेंना 62569 मते मिळाली. भास्कर जाधवाचा कार्यक्षेत्र आणि सेनेची आमदारकी असलेल्या चिपळूण मतदारसंघात शिवसेनेनं 85132 मते तर काँग्रेसला 53992 मते मिळाली.

खरंतर या निकालाने अनेक धक्कादायक गोष्टीवर सर्वच राजकिय पक्षाचे डोळे खडकन उघडून ठेवले आहेत. राणेंच्या पराभवाची मिमांसा आता पुढचे काही दिवस वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रातून होतच राहील. पण एक गोष्ट मात्र नक्की, विधानसभा निहाय झालेले मतदान पाहता आणि मागच्या निवडणुकीची आकडेवारी ताडुन पाहिली तर कॉंग्रेसचा पराभव काँग्रेसनेच केलाय हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालय. स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीबद्दल जनतेच्या मनात तीव्र असंतोष होता, त्यावर वेळोवेळी पांघरुण घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याचीच परिणाम वजा हार आज खुद्द राणेंना सहन करावी लागलीय. हा पराभव राणेंच्याच नाहीतर आता जिल्हावासियाच्या जिव्हारी लागलाय.

पण विचार मतदार राजांने नाहीतर नेतृत्वाने करण्याची वेळ आलीय. जिथ भाकरी फिरवायची तेव्हा नाही फिरवली तर भाकरी करपते ही साधी गोष्ट गांभिर्याने घ्यावीच लागणार आहे. खरतर या निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रत्येक मतदारसंघात मोठमोठ्या सभांचे आयोजन केलं होत. आणि कार्यकर्त्याचे बळ नसलेल्या शिवसेनेनं असलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर कोपरान कोपरा पिंजून काढला आणि विजयश्री खेचून आणली. मतदानाच्या अगोदर स्थानिक पत्रकारांची कुजबुज काँग्रेस नेतृत्वापर्यंत न पोहोचू देण्यात स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिक आभाळाएवढी मोठी समजणारी नेतृत्व धन्यता मानत होती आणि त्याचाच फटका राणेंना बसला. माझ ठाम मत आहे कि या मतदारसंघात मोदी लाट नव्हती. नीलेश राणेंविरोधात असंतोषही नव्हता. फक्त स्थानिक नेतेमंडळीचा आपसातला कलह हाच कु-हाडीचा दांडा गोतास काळ ठरलाय. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेला पाहू असं म्हणणारे व्हॉटसएपचे मेसेज आता फिरवूुन काय उपयोग आहे देव जाणे ! राणेंना स्वत:ला आव्हान नसलं तरी देखिल काँग्रेस या संपूर्ण मतदारसंघात आता अस्तित्वासाठी झुंजावे लागणार आहे. त्यातल नीलेश राणेंच्या पराभवानंतर नारायण राणेंचा राजीनामा हा काँग्रेस नेतृत्वाच्या अ़डचणी वाढवणारा ठरणारा आहे.

यानिमित्तानं शिवसेनेला संजीवनी आणि काँग्रेसला अंजन मिळालय. बॅ.नाथ पै आणि दंडवतेचा वारसा सांगणा-या याच मतदारसंघाने शिवसेनेचा बोलबाला असतानाही सुधीर सावंत या काँग्रेसच्या नवख्या उमेदवाराला खासदार बनवलं होत. याच मतदारसंघाने सुधीर सावंताना नाकारुन शिवसेनेच्या विचारवंत सुरेश प्रभू यांनाही खासदारकी बहाल केली. राणेंवर विश्वास ठेवत डॉ.निलेश राणे यांना खासदारकीही बहाल केली. गेल्या पाचवर्षाचा लेखाजोखा ताडत उच्चशिक्षीत नसतानाही शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी खासदारकीची माळ घातलीय. विजयश्री घोषित होताच शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचनाला जागत रत्नागिरीलाही भेट दिली. आणि शिवसैनिकांच्या आनंदाला चार चांद लावलेयत. आठवडाभर एन एच 17 भगव्या झेंड्यानी गजबजूनही जाईल.. पण त्यानंतर पुन्हा एकदा महामार्ग रिता होईल. त्याच्या दुतर्फा विकास दिसण्याचे शिवधनुष्य आता विनायक राऊत यांना पेलावं लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 17, 2014, 11:21
First Published: Saturday, May 17, 2014, 11:35
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?