Last Updated: Monday, June 4, 2012, 18:11
www.24taas.com, तिरुवनंतपुरम उत्तर आणि मध्य भारत कडक उन्हाने होरपळत असताना आज भारतीय हवामान खात्याने एक गुड न्यूज दिली आहे. येत्या ४८ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडकणार असल्याचे भारतीय हवामान खात्याचे संचालक व्ही. के. राजीव यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
यापूर्वी भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार सध्या मान्सून केरळच्या किनारपट्टीवर येण्यासाठी चांगले वातावरण आहे. साधारणतः केरळ किनारपट्टीवर १ जूनपर्यंत दाखल होतो.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा झाल्यामुळे मान्सूनला उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या ४८ तासात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, गेल्या रविवारी (काल) केरळ आणि लक्षद्विपच्या काही भागात मान्सून पूर्व पाऊस झाल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले. आज दुपारी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याचेही वृत्त आहे.
First Published: Monday, June 4, 2012, 18:11