Last Updated: Thursday, April 12, 2012, 14:11
www.24taas.com, अहमदाबाद गुजरातमध्ये २००२ च्या गोध्राकांडानंतर उसळलेल्या आणंद जिल्ह्यातल्या पिरावली भगोल हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवलेल्या २३ जणांपैकी १८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित पाच जणांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सोमवारी कोर्टानं दिलेल्या निर्णयात इतर २३ जणांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली होती. या प्रकरणात ४७ आरोपी होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला असल्यामुळं ४६ आरोपींबाबत फैसला झाला. आणंद जिल्हा स्पेशल कोर्टानं याप्रकरणी निकाल दिला.
गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर दंगल उसळली होती. त्यानंतर अहमदाबाद जवळील आणंद जिल्ह्यातील ओड गावात १ मार्च २००२ रोजी ही दंगल उसळली होती. यात संतप्त जमावाने मुस्लिम समुदायातील २० घरांना आग लावली होती. त्यात पिरावली भगोल या भागातील महिला व बालकांसह २३ जणांना जिवंत जाळण्यात आले होते. या खटल्यात एकूण ४७ जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीनं या प्रकरणी चौकशी केलेली आहे.
First Published: Thursday, April 12, 2012, 14:11