Last Updated: Monday, July 16, 2012, 16:55
www.24taas.com, नवी दिल्ली आमिर खानने सत्यमेव जयते कार्यक्रमातून वाचा फोडलेल्या प्रश्नाबाबत पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे. तशी माहिती सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी दिली. पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमिरला वासनिक यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला होता.
आमिर खानने सत्यमेव जयतेच्या ८ जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमात मैला साफ करणाऱ्यांच्या प्रश्नांना आणि व्यथांना वाचा फोडली होती. त्यानंतर समाजातील या प्रथेला मिटवण्याची चर्चा देशात सुरु झाली आहे. आमीर आणि मुकुल वासनिक यांनी आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. समाजातील सर्व नागरिकांना जगण्यासाठी समान अधिकार मिळायलाच हवा, पण देशात अशा प्रथा अजूनही देशात असल्याचं, मुकुल वासनिक यांनी म्हटलं.
या समस्येवर उपाय योजला जाईल, असं आश्वासन मुकुल वासनिक यांनी दिलं. सरकारने या मुद्द्याला गांभीर्याने घेतल्याबद्दल आमिरने समाधान व्यक्त केले आहे. भारतात आजही तीन लाख लोक हाताने मैला साफ करतात. सरकार पावसाळी अधिवेशनात नवं विधेयक मांडणार आहे. या विधेयकाद्वारे मैला साफ करण्याची प्रथा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन सरकार तर्फे देण्यात आले आहे.
First Published: Monday, July 16, 2012, 16:55