Last Updated: Friday, July 19, 2013, 13:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्य शासनाने गुटखा, पानमसाल्यावर वर्षभर बंदी वाढविली आहे. गुटखाबंदीची ही मुदत २० जुलै रोजी संपणार होती. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेत ही बंदी वर्षभरासाठी वाढविली.
गुटखा आणि पानमसाल्याचे उत्पादन, वितरण, साठवणूक आणि विक्रीवर राज्य सरकारने टाकलेली बंदी एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानसभेत दिली. गतवर्षीच्या अधिवेशन काळात १९ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरात गुटख्यावर एक वर्षासाठी बंदी टाकली होती.
दरम्यान, राज्यशासनाच्या भूमिकेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. गुटखाबंदीचा थेट कायदा न करता, बंदीचा कालावधी एकेक वर्षाने वाढविण्याच्या निर्णय योग्य नाही, असे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी म्हटलेय. या बंदीची अवस्थाही डान्स बारबंदीसारखी होईल, असा टोला त्यांनी हाणला.
गुटखा व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला यातून बाहेर करण्यासाठी सरकारला मिळणाऱ्या १००कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडण्यात आले आहे. बंदीअंतर्गत गुटखा, पानमसाला तसेच अन्य गुटखाजन्य पदार्थांचा साठा, वितरण व विक्री करणाऱ्याला किमान एक ते १० लाख रुपये दंड, तसेच सहा महिने ते सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, July 19, 2013, 13:43