Last Updated: Saturday, April 20, 2013, 09:16
www.24taas.com, मुंबई मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय. या सोसायटीमध्ये अजित पवार, गोपीनाथ मुंडे, माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे फ्लॅटस आहेत.
वरळीमधली सुखदा-शुभदा सोसायटी... या सोसायटीतल्या अनधिकृत बांधकामांबाबत मुंबई महापालिकेनं अनेक राजकीय नेत्यांना नोटीस बजावलीय. ही जागा सीआरझेडमध्ये येत असल्यानं, या इमारतीला वाढीव एफएसआय देता येत नाही. मात्र नियम डावलून या इमारतींच्या अनेक गाळ्यांमध्ये बदल करण्यात आलेत. या सोसायटीमध्ये अजित पवार, गोपीनाथ मुंडे, शिवराज पाटील, माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, अनिल देशमुख, रणजित देशमुख, प्रतापसिंह मोहिते पाटील आणि अण्णा डांगे या राजकीय नेत्यांचे फ्लॅटस आहेत. या सगळ्यांना महापालिकेनं नोटीसा बजावल्या आहेत.
मुंबई महापालिकेनं बजावलेल्या नोटिशीनुसार हे बांधकाम हटवलं नाही तर सर्वांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. पुढच्या तीस दिवसांत हे बांधकाम हटवावं लागेल किंवा अधिकृत करुन घ्यावं लागेल. बेकायदा बांधकामप्रकरणी दोषी आढळल्यास एक महिना ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.
मुळात मुंबई पोलिसांसाठी राखीव असलेला हा भूखंड नंतर नेत्यांच्या सोसायटीसाठी देण्यात आला होता. सुखदा-शुभदासह कृष्णा, वैतरणा, वैनगंगा, गोदावरी, पूर्णा, भीमा या नेत्यांच्या सोसायटी याच भूखंडावर आहेत. सुखदा-शुभदा सोसायटीतल्या अनधिकृत बांधकामांबाबत सामाजिक कार्यकर्ते अमित मारू यांनी मुंबई पालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालिकेनं या नोटिसा पाठवल्यात. आता या प्रकरणी काय कारवाई होणार आणि खरंच कारवाई होणार का? याकडे लक्ष लागलंय.
First Published: Saturday, April 20, 2013, 09:16