Last Updated: Tuesday, December 13, 2011, 15:48
झी २४ तास वेब टीम, मुंबई गिरणी कामगारांना अजूनही घरांचे वाटप झाले नसल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा इशारा गिरणी कामगारांनी दिलाय. काल हुतात्मा बाबू गेनू यांची पुण्यतिथी होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वदेशी आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या या हुतात्म्याला आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत गिरणी कामगार एकत्र आले होते.
बाबू गेनू रोडपासून ते भारतमाता सिनेमापर्यंत कामगारांनी पदयात्रा काढली होती. गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांनी कामगारांच्या घरांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. गिरणी कामगारांना अजूनही घरांचे वाटप झाले नसल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा इशारा गिरणी कामगारांनी दिलाय.
गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर यापूर्वी बरीच आंदोलनं झाली. पण, त्यतून अद्याप काहीही निष्पन्न झालेलं नाही. मध्यंतरी या प्रश्नावर झालेल्या आंदोलनात मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्रही आले होते. परंतु, तरीही या प्रश्नावर उचित तोडगा निघालेला नाही.
१२ डिसेंबर १९३० रोजी बाबू गेनू या गिरणी कामगाराने विदेशी कापड घेऊन जाणारा ट्रक अडवताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
First Published: Tuesday, December 13, 2011, 15:48