Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:06
www.24taas.com, सांगली सांगलीतल्या अफूच्या शेती प्रकरणामुळं आता राजकीय नेत्यांनाही नशा चढू लागली आहे. अफूच्या शेतीवरुन वनमंत्री पतंगराव कदम यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलंय. पोलिसांनी हप्ते घेणं थांबवलं तर काम चांगलं होईल, असा टोला पतंगरावांनी हाणला आहे. सांगली जिल्ह्याचं काम भारी म्हणून नारायण राणे टीका करतात असंही त्यांनी म्हटलंय.
राज्यभरात फोफावलेल्या अफू शेती प्रकरणात आता पोलिसांवरच आरोप होऊ लागलेत. शेतकऱ्यांनी पोलिसांना हप्ते दिले नाहीत म्हणूनच त्यांनी अफू शेतीविरोधात कारवाई सुरु केल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलाय. वनमंत्री पतंगराव कदम यांनी पोलीस आणि गृहखात्याला टार्गेट केलं असताना आता शेतकरी संघटनेनं केलेल्या या आरोपामुळे पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
अतिरीक्त अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकले होते. कारवाई सुरु आहे. गुन्हेगारांना झोडण्याची फोडण्याची भाषा करणा-या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अफूचे म्हणजेच विषाचे सौदागर खुलेआम व्यवहार करत असल्याचं उघडकीस आलं होतं. ‘ झी २४तास’नं बीडमधील अफूच्या शेतीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर सांगलीतही अफूच्या लागवडीचं प्रकरण उघडकीस आलं.
First Published: Wednesday, February 29, 2012, 16:06