Last Updated: Wednesday, August 29, 2012, 14:29
www.24taas.com, नवी दिल्लीभारतीय पुराणांमधील ज्या महाकाव्यांना धर्मशास्त्राइतका महत्वाचा दर्जा दिला आहे, त्यातील एक म्हणजे रामायण. आदर्श संस्कार आणि नीतिमूल्यांचा ठेवा म्हणून रामायण नेहमीच शिरोधार्य मानलं गेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना साक्षात् देव मानलं जातं. तरीही त्यांच्या अस्तित्वावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं होतं. अयोध्येतील राममंदिराच्या वादावरही रामजन्माच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित होत होती.
मात्र, दिल्ली येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर सायंटिफिक रिसर्च ऑन वेदाज’ या संस्थेने प्रत्यक्षात प्रभू श्री रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळवले असल्याचा दावा केला आहे. ‘प्लॅनेटेरियम’ सॉफ्टवेअरच्या मदतीने संशोधकांनी हे पुरावे शोधले असल्याचं सांगितलं जात आहे.
या संस्थेच्या संचालक सरोज बाला यांनी या संदर्भात माहिती दिली. प्रभू रामाचा जन्म १० जानेवारी ५०१४ इ.स.पूर्वी झाला होता. ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तो चैत्र महिना होता व त्या दिवशी शुक्ल पक्ष नवमी होती. तसेच दुपारी १२ ते २ यावेळेदरम्यान रामाचा जन्म झाला होता. या संशोधनानंतर अनेक पौराणिक घटनांचा आढावा जगासमोर आणण्यासाठी शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र मेहनत करावयास सुरुवात केली आहे.
खगोलशास्त्रीय गणितांनी या काळाचा वेध घेण्यात येत आहे. त्या काळातील घटनांची सत्यता पारखून घेण्यासाठी प्लॅटिनम सॉफ्टवेअरवरील आकडेमोड उपयोगी पडत आहे. रामायणातील भौगोलिक आणि शास्त्रीय घटनांचा वेध घेत प्रभू रामचंद्रांचा काळ, त्यांचं अस्तित्व आणि तत्कालीन भारत यांचा अभ्यास करता येऊ शकतो. यामुळे हिंदू महाकाव्यांना भक्कम आधार मिळेल.
First Published: Wednesday, August 29, 2012, 09:09