Last Updated: Friday, October 11, 2013, 14:13
www.24taas.com , झी मीडिया, ठाणेठाणे महापालिका स्थायी समिती निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध स्थायी समितीवर निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धूळ चारली.
जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेने या निवडणुकीत क्लिन बोल्ट केल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे महायुतीचा आघाडी काँग्रेसला जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक आज झाली. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश साळवी यांनी राजीनामा दिला. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ही निवडणुकीची सेनेची खेळी असल्याचे म्हटले जात आहे. ते महायुतीला मतदान करतील या भीतीने आघाडीच्या उमेदवारांने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
दरम्यान भाजपचे संजय वाघुले यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.. त्यामुळे शिवसेनेच्या या खेळीमुळे आघाडीपुढे पेच निर्माण झाल्याचं बिनविरोध निवडीतून स्पष्ट झाले. स्थायी समितीत महायुतीचे ८ तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ८ सदस्य आहेत. मात्र साळवी यांच्या राजीनाम्यामुळे आघाडी अडचणीत वाढली होती.
युतीकडून बसपाचे विलास कांबळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. भाजपच्या संजय वागुले यांनी बंडखोरी करत फॉर्म भरला होता. तर दुसरीकडे आघाडीनं संजय भोईर यांना उमेदवारी दिली,परंतु मनसेचे सुधाकर चव्हाण यांनी तठस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने आघाडीत चिंतेचं वातावरण होते. त्यामुळे आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाणे पालिकेत राजकीय नाट्य पाहायला मिळाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच आमचे नुकसान केले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गतवर्षी आम्ही ही निवडणूक जिंकली होती. मात्र, आमचा अंधविश्वास याला कारणीभूत असल्याचे ते म्हणालेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, October 11, 2013, 13:56