Last Updated: Tuesday, February 28, 2012, 07:31
सुरेंद्र गांगण कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्ग. मात्र, या निसर्गावर लाकूड व्यापाऱ्यांनी घाला घालून पैशासाठी निसर्गाची लूट केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास निम्मा जंगलभाग हा कोकणात होता. आता हे प्रमाण घटत आहे. हे सांगण्याचे कारण की, कोकणच्या वातावरणाला पोषक असे उद्योग आले नाही. मात्र, वातावरण बिघडविणारे प्रकल्प आणले गेलेत. यातून राजकारणही केलं गेलं, ते आजही सुरू आहे.
मात्र, याला एक अपवाद राहिला आहे, कोकण रेल्वेचा. दिवंगत बॅ. नाथ पै आणि प्रा. मधु दंडवते यांनी जे कोकणातील जनतेला आश्वासन दिलं होतं, ते त्यांनी कोकण रेल्वे आणून पूर्ण केलं. (आज कोकण रेल्वेचा जास्त फायदा कोकणला न होता तो अन्य राज्यातील जनतेला होत आहे. रेल्वे कोकणात असूनही ती कोकणात नाही, अशी परिस्थिती ही राजकीय लोकांनी केली आहे.) ज्या उद्देशाने रेल्वे आणली तिचा कोकणी माणसाला लाभ होत नाही, याबाबत कोणी आवाजही उठवत नाही, ही कोकणच्या जनतेची शोकांतिका आहे. 
केवळ कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचं स्वप्न दाखवलं गेलं. ते आजही स्वप्न राहिलं आहे. प्रा. मधु दंडवते यांनी जे जनतेला स्वप्न दाखविले ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. ते समाजवादी पक्ष विचारसरणीचे होते. जनता दल या राजकीय पक्षाच्या माध्यमातून जे काही करता येईल, ते त्यांनी केले. त्यानंतर मात्र, शिवसेनच्या भगव्याची जी लाट आली ती कोकणात पसरली. कोकणच्या विकासाची गंगा वाहण्याची स्वप्न दाखविली गेली. जो कोकणच्या मुळावर एन्रॉन प्रकल्प आहे, तो अरबी समुद्रात बुडविण्याची भाषा शिवसेने केली. महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजप युतीने हा प्रकल्प बुडविण्या ऐवजी वर काढला. मात्र, तो बुडीत गेला. त्याचा फायदा काहीही झाला नाही. परंतु राजकीय लोकांनी त्याचा ‘लाभ’ उठविला. या प्रकल्पावर जेवढे पैसे खर्च झालेत तेवढ्याच पैशावर फळ प्रक्रिया करणारे किंवा आयटी सारखा उद्योग उभा राहिला असता, याचा कोणी विचार केला नाही. केवळ राजकीय सत्ता मिळविण्यासाठी जनतेकडे दुर्लक्ष करून राजकारण केले गेले.

आज कोकणात औष्णीक प्रकल्प सुरू आहेत. कोकणात काय पिकतं, काय रूजतं आणि कशी पर्यटनाला चालना मिळेल यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. जे पिकतं त्यावर आधारीत जरी उद्योग आणले तरी येथील तरूणांच्या हाताला काम मिळेल. परंतु त्याबाबत कोणीही बोलत नाही. जर कोणी बोलले तर ते निवडणुकी पुरतं असतं. प्रदूषण करणारे उद्योग हे कोकणच्या मुळावर येण्याची शक्यता अधिक आहे. याला कोकणी जनतेने विरोध केला आहे. हा विरोधकाचा धागा पकडून राजकीय पक्षांनी केवळ राजकारण केलं. ते आजही सुरू आहे. राजकारणाचा विचार केला तर विकासाचे राजकारण न करता जनतेला स्वप्न दाखविण्याचे राजकारण केले जात आहे. जो राजकीय पक्ष विकासाचे स्वप्न दाखवतो त्या पक्षाच्या झोळीत जनता मतं टाकून त्या राजकीय सत्तेची झोळी भरतो. परंतु त्याचा विकासासाठी उपयोग होत नाही, असे जेव्हा दिसते त्यावेळी निवडणुकीत त्या पक्षाची जागा मतदार दाखवून देतो. ही परंपरा आजही दिसून येत आहे.
कोकणात काँग्रेसची पूर्वीपासून सत्ता होती. कोकणकडे दुर्लक्ष केल्याने जनतेने काँग्रेसला “हात” दाखवला. विकासाच्या नावावर जनता दलाने काहीकाळ आपले वर्चस्व राखले. परंतु ज्याप्रमाणात विकास व्हायला हवा होता तो झाला नाही. कोकणचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी सेनेला साथ दिली. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. परंतु विकास न केल्याने शिवसेनेला हा गड राखता आला नाही. त्यामुळे काही ठिकाणी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पक्ष संघटनेत पुट पटली आणि शिवसेना बॅकफूटवर गेली. नव्याने स्थापन केलेल्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले जाळे कोकणात रूजविण्यास सुरूवात केली. आज हा पक्ष विकासाची स्वप्न दाखवतो आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्यास सुरूवात केली. परंतु त्यांनीही विकासात काही करून दाखवलं नाही. त्यामुळे त्यांनाही फटका बसला आहे. काँग्रेसने जरी विकासाचा मुद्दा सांगून राजकारण केलं तरीही जनतेचा विश्वास नसल्याने रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात काँग्रेस जम मारू शकलेला नाही. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांनी विकासाचे स्वप्न पुन्हा दाखविल्याने त्यांना प्रतिसाद मिळाला. परंतु त्यांनाही जनतेने काही प्रमाणात हिसक्का दाखविला आहे. 
जिल्हापरिषद निवडणुकीत नारायण राणे यांच्या पक्षाच्या जागा कमी झाल्या आहेत. तर नगरपरिषद निवडणुकीत जोरदार संघर्ष करावा लागला आहे. तिच परिस्थिती रत्नागिरीत दिसून येत आहे. शिवसेनेची जरी सत्ता असली तरी सेनेलाही आपल्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. तसेच रायगडात शेतकरी कामगार पक्षाता दबदबा होता. कामगार वर्गाचा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिले जायचे. त्याचेही अस्तीत्व आता धोक्यात आले आहे. हा का बद्दल होत आहे, याचा विचार त्या त्या पक्षांतील नेते मंडळींना करावा लागणार आहे. कारण रायगडात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाय रोवायला सुरूवात केली आहे. हे असं का होत आहे, हे प्रत्येक पक्षाला विचार करायला भाग पडणार आहे. कारण, काय करून दाखवलं, हे त्यांना सांगता आलं नाही. विकासकामांबाबत काय करणार आहोत, याचा लेखाजोगा आता राजकीय पक्षांनी मांडला नाही तर, कोकणातील जनता हा नेहमीच बदल घडवून आणील यात शंका नाही. जो विकास करील त्यालाच साथ देणारी कोकणची जनता अशी ओळख आता कोकणची झाली आहे.
First Published: Tuesday, February 28, 2012, 07:31