अनुभव `अग्निपथ`चा Experience of Agnipath

अनुभव `अग्निपथ`चा

अनुभव `अग्निपथ`चा
अविनाश घोडके
सह-संवाद लेखक, अग्निपथ

बांद्र्याच्या `माउंट मेरी`चं दर्शन घेऊन परतत होतो. वाटेत `मेहबूब स्टुडिओ` लागतो. एका कॅमेरामन मित्राने तिथे `Instolation Art `चं प्रदर्शन बघ असं सांगितलं होतं. प्रदर्शनात जत्रेत असतो तसा भला मोठा Magnifiing आरसा लावला होता. आरशात स्वतः ची `Larger than life` प्रतिमा बघून मनातील एक सल जिवंत झाली. खरा `Larger than life` अनुभव देणारा `हिंदी सिनेमा` आपल्या वाट्याला आला नाही हीच ती सल होती. मी ज्या 'मेहबूब स्टुडिओ` मध्ये उभा राहून हा विचार करत होतो त्यांच `मेहबूब स्टुडीओ` मध्ये आठवडा भराने करण मल्होत्रा ने मला बोलावले आणि `अग्निपथ` च्या सह-संवाद लेखनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली . मी यापूर्वी मराठीत `देवदासी` आंणि `थैमान` हे आनंद शिशुपाल यांचे दोन चित्रपट लिहिले होते.`थैमान` च्या ट्रायल-शो च्या वेळी माहिमला एका मिनी थिएटर च्या लॉबीत शो ची वाट पहात आम्ही बसलो होतो. माझ्या बाजूला बसलेल्या अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर मला विचारत होत्या .." अविनाश करण जोहरच्या प्रोडक्शनचं नाव काय ?" मी ब्लँक झालो होतो. नाव माहित होतं पण ऐन वेळी आठवत नव्हतं. पुढे `धर्मा प्रोडक्शन` मला करिअर च्या अविस्मरणीय वळणावर नेवून सोडेल हे त्या वेळी माझ्या ध्यानी ही नव्हतं.

`मेहबूब स्टुडीओ` मध्ये त्या दिवशी ऋषी कपूरजी यांची `रौफ लाला` या पात्रासाठी `लुक-टेस्ट` चालली होती.खरं तर ऋषी जी `रौफ लाला` हे पात्र करायला तयारच नव्हते. " मै ये रोल करुंगा तो पिक्चर चलेगी नही " असं ते म्हणत होते .पण करण मल्होत्रा आपल्या मताशी ठाम होता. करण ने नंतर मला ऋषीजींचे `रौफ लाला` गेट-अप मधले फोटो दाखवले तेव्हा करण च्या अचूक दिग्दर्शकीय दृष्टीचा प्रत्यय मला आला.

एका दृश्यात कांचा रौफ लालाला प्रथमच भेटतो असे दाखवले आहे.त्यावेळी रौफलाला कोकेनच्या धंद्यात घुसखोरी करू पहाणाऱ्या अननुभवी आणि अतिमहत्त्वाकांक्षी कांचाला अपमानित करताना दाखवायचे होते. मी लालाच्या तोंडी कांचासाठी `उठाई गिरा ` असे अपमानकारक संबोधन दिले.पण ऋषीजी `उठाई गिरा` हा शब्द प्रथमच ऐकत होते. माहित नसलेला हा शब्द उच्चारायला ते कां-कू करू लागले. करणला मात्र मी लिहिलेला `उठाई गिरा` हा शब्द लाला च्या तोंडी हवा होता.दिग्दर्शनाच्या पहिल्याच अनुभवातून जाणारा करण मल्होत्रा मोठ्या स्टार नटापुढे बधला नाही. अखेर लालाने `उठाई गिरा ` हा शब्द उच्चारत कांचाची मानहानी केली.

अनुभव `अग्निपथ`चा

सेटवर करण ने माझी प्रियांका चोप्रा शी ओळख करून दिली.म्हणाला .."ये अविनाशजी है .." त्याने ज्या विश्वासाने आणि आदराने हे वाक्य उच्चारलं होतं त्यात माझा सगळा बायोडाटा प्रियांकाला काळाला असावा.तिनेही तेवढ्याच विश्वासाने हसत हस्तांदोलन केले."मुझे कुछ बोलना है " असं म्हणत ती मला घेऊन बाहेर आली व `या दृश्यात काली च्या तोंडी काही मराठी शब्द दे` असं आवर्जून सांगू लागली. गंभीर दृश्यात खूप मराठी शब्द नको असे करणला वाटत होतं. मी पेचात पडलो. प्रियांकाला अपेक्षित संवाद लिहून मी सीन करणचा सहायक ‘चरित्र’ याच्याकडे दिला आणि मोकळा झालो. संध्याकाळी प्रियांकाच बोलावणं आलं. वर्सोव्याला उभ्या केलेल्या गिरगावच्या चाळीच्या सेटवर मच्छर प्रति-बंधक धुराची फवारणी होत होती. कालीच्या वेषातली आजची युथ-आयकॉन प्रियांका चोप्रा चाळीच्या अंगणात एकटीच खुर्ची टाकून बसली होती.धुरामुळे तिने चेहऱ्याला दुपट्टा गुंडाळून घेतला होता. मी पोहोचताच ती म्हणाली " वो सीन लिख लिया आपने ?" . माझ्याकडे कॉपी होती .मी तिला सीन वाचून दाखवू लागलो. तिनेही वाक्य काळजीपूर्वक कागदावर लिहून घेतली. दृश्यात काली विजयला धीर देत "तू जा विजय " असं म्हणत होती.प्रियांका मला म्हणाली " ये जो `जा` वर्ड है ना ..वो मै मराठी `जा` ( जिभेच्या टोकावर) जैसे बोलुंगी !!" तिच्या या मराठी भाषेच्या उच्चारा विषयीच्या बारकाव्याबद्दल मी तिचे मनापासून अभिनंदन केले. एका मराठी माणसाने स्तुती केली म्हणून ती ही शाळकरी मुली सारखी आनंदून हसली. मुंबईत लहानाची मोठी झाली नसूनही प्रियांकाची मराठी एवढी चांगली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे .

अनुभव `अग्निपथ`चा

पण अखेर सीन मराठी शब्दांशिवायच चित्रित झाला. करणचा दिग्दर्शकीय मुद्दा मला पूर्ण पटला होता.करण मल्होत्रा स्वतः आवडीने कोल्हापुरी चप्पल घालतो. त्याला मराठी संस्कृतीबद्दल पूर्ण आदर आहे . पण शेवटी मोठे काम करताना नुसते भावनिक होवून चालत नाही.`व्यावसायिक तर्कांना प्राधान्य` हे हिंदी सिने सृष्टीच्या कामाचं खास `सूत्र` मी धर्मा प्रोडक्शन मध्ये पाहिलं आणि अनुभवलं . ही व्यावसायिकता राबवताना ते कुठे ही मनाचा कोतेपणा दाखवत नाहीत. इथे गुणांची कदर केली जाते. नवीन आणि अनोळखी कलाकर्मींना उगीचच कमी लेखण्याचा केविलवाणा प्रकार मराठी चित्रपट सृष्टीत केला जातो, हे मी स्वतः अनुभवले आहे. माझा `अग्निपथ` चा अनुभव त्याच्या अगदी विरुद्ध आहे.हा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहील

करण जोहर च्या प्रोडक्शन कंपनीचं नाव ` धर्मा प्रोडक्शन` आहे हे आता मी कधीच विसरणार नाही.

First Published: Wednesday, October 24, 2012, 15:50


comments powered by Disqus