Last Updated: Friday, November 30, 2012, 13:50
www.24taas.com, मुंबई टोरांटो आणि कॅनडामध्ये आयोजित केलेल्या `विश्व मराठी साहित्य संमेलना`च्या आयोजनासंबंधी विविध वाद सुरू असतानाच आता राज्य सरकारनं या संमेलनांकरता देऊ केलेला निधी परत मागितल्यानं आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलंय.
टोरांटोमध्ये संमेलन झालं नाही म्हणून डिसेंबरमध्ये मलेशियात आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाकरिता हा निधी वळता करण्याची मागणी महामंडळानं केली होती. पण राज्य सरकारनं महामंडळाची ही मागणीदेखील फेटाळून लावलीय. महामंडळाला लिहिलेल्या पत्रात राज्य सरकारनं घटनेत संबंधित बदल करण्याचेदेखील आदेश दिलेत. देशाबाहेर जागतिक साहित्य संमेलन आयोजित करण्यासंबंधी कुठलीच तरतूद महामंडळाच्या घटनेत नसल्याची तक्रार मराठी साहित्य क्षेत्रातून नेहमीच ऐकायला मिळत असे. आता राज्य सरकारनं आपल्या पत्रात याचा उल्लेख करत निधी मिळवण्याच्या आधी महामंडळाच्या घटनेत आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेत.
माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांच्या माध्यमानं हे देखील स्पष्ट होतंय की टोरांटोच्या आधी आयोजित झालेल्या तीन विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी दिलेल्या निधीचा वापर कशाप्रकारे झाला याची माहितीही सरकारनं मागितलीय. इतकंच नव्हे तर या तीन संमेलनात सहभागी झालेल्या साहित्यिकांची नावं आणि पदनामासंबंधी माहितीदेखील सरकारला सादर करण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आलेत.
First Published: Friday, November 30, 2012, 09:02