Last Updated: Sunday, July 15, 2012, 12:48
www.24taas.com, पुणे खडकवासला धरणातलं पाणी टंचाईग्रस्त दौंडला देण्याच्या पालकमंत्री अजित पवारांच्या सुचनेला खासदार सुरेश कलमाडींनी विरोध केलाय. पुण्याचं पाणी पुण्यालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कलमाडींनी घेतल्यानं, या विषयाला राजकीय रंग चढू लागला आहे.
दौंड शहर आणि परिसरातल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवारांनी खडकवासला धरणातलं पाणी द्यायला मान्यता दिली. खकडवासला धरणातही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिलाय. महिनाभर पुरेल इतकंच पाणी धरणात शिल्लक आहे. येत्या ४-६ दिवसात पाउस नाही आला तर पाणीकपात आणखी वाढवली जाणार आहे.
खडकवासल्यात १.६८ टी एम सी पाणी आहे. त्यापैकी दौंडला अर्धा टी एम सी दिल्यास १.१८ टी एम सी पाणी शिल्लक राहणार आहे. आतापर्यंत ग्रामीण भागानं शहराचं पाणी पळवल्यानं आदी शहराची व्यवस्था करा, अशा शब्दत कलमाडींनी पवारांवर निशाणा साधलाय.
संकटाच्या परिस्थितीत पाण्याचं समान वाटप झालं पाहिजे, या भूमिकेतून टंचाईग्रस्त भागाला हे पाणी देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केलंय .हे पाणी फक्त पिण्यासाठीच दिले जाणार आहे. वेळ प्रसंगी पोलीस बंदोबस्तात हे पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान या विषयावरून राजकारण रंगणार हे आता स्पष्ट झालंय.
First Published: Sunday, July 15, 2012, 12:48