राष्ट्रवादीचे हसे, पवारांचे ऐकतोय कोण?, Sharad Pawar & Nationalist Congress Party

राष्ट्रवादीचे हसे, पवारांचे ऐकतोय कोण?

राष्ट्रवादीचे हसे, पवारांचे ऐकतोय कोण?
सुरेंद्र गांगण
gangan.surendra@gmail.com

शरद पवार द्रष्टा नेता. महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार नेते. निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आमदार झालेले पवार यांनी मंत्रीपद भुषविल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले. त्यानंतर ते दिल्ली दरबारी पोहोचले. तेथेही त्यांनी आपली छाप टाकली. त्यामुळे केंद्रात त्यांना मान मिळाला. पवारांनी सांगितले तर कोणीही त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या सूचनेची कशी अंमलबजावणी होईल, यावर भर दिला जातो. असा जाणकार नेता ज्यावेळी आपल्याच शिलेदारांना आदेश देतो, त्यावेळी त्याचे तंतोतंत पालन होणे आवश्यक असते. मात्र, महाराष्ट्रात त्याचे उलटेच झालेय. चक्क पवारांचे आदेश धाब्यावर बसविले गेलेत. त्यामुळे शरद पवारांचे ऐकतो कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळ पडलाय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दुष्काळ निवरणासाठी मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा, असा आदेश शरद पवारांनी दिला होता. मात्र, पवारांच्या आदेशाला मुठमाती दिली, ती कोकणातील मंत्री भास्कर जाधव यांनी. त्यांनी कंत्राटदाराला मदतीला घेत कोटयवधीची उधळ मुलांच्या लग्नात केली. ही बाब मीडियाने पुढे आणली. त्यावेळी शरद पवार चिडलेत. ते म्हणाले, अशी उधळपट्टी करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही. मात्र, जाधव यांनी माफी मागितल्याने वादवर पडदा टाकण्यात आला.
राष्ट्रवादीचे हसे, पवारांचे ऐकतोय कोण?

राष्ट्रवादीने जाधवांना अभय दिले. असे असताना आयकर अधिकाऱ्यांनी जाधव आणि शहा कंत्राटदाराच्या घर, हॉटेलवर छापे टाकले. त्यामुळे राष्ट्रवादीची पंचाईत झाली. हे कमी की काय? जाधव यांच्याप्रमाणेच मुलाच्या शाही लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणारे सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लागला. केंद्रीय आयकर विभागाच्या पथकाने नायकवडी यांच्या मिरजेतील घरावर छापा टाकला. तर पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. यावरून पवरांच्या शब्दाला किंमत दिली गेली नसल्याचे दिसून आले. दुष्काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अशी पैशाची उधळपट्टी होत असल्याने दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचे धोतक आहे. तर बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली करण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी फिल्डींग लावली होती. दुष्काळात ते काम करीत नाहीत, असा त्यांचा सूर होता. जर त्यांनी चांगले काम केले नसेल तर त्यांची बदली होणे आवश्यक होते. मात्र, दुष्काळाच्या नावाखाली इथेही राजकारण खेळले गेले. त्यामुळे दुष्काळाबाबत राष्ट्रवादीचा कळवला दिसून येत आहे.

चारा छावणी जनावरांची न राहतात ती माणसांचीच झालीय, हे तेथील दृश्यांवरून दिसून येत आहे. भर उन्हात जनावरांबरोबरच माणसांची फरपट होत आहे. देशाचे कृषीमंत्री यांच्याच मतदार संघात दुष्काळ आहे. त्याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही, असे येथे पाहिल्यावर दिसते. पवारांनी एका दिवसाचा पगार दुष्काळांसाठी दिला. (राष्ट्रवादीने दुष्काळग्रस्त काही गावे दत्तक घेणे उपेक्षित होते.) देशाचे राजकारण जवळून पाहणाऱ्या या द्रष्ट्या नेत्याच्या एका पगारांने काय होणार? ज्यांनी लाखोंची उधळपट्टी केली त्यांच्याकडून दुष्काळासाठी निधी घेतला पाहीजे होता. तरच राष्ट्रवादी पक्षाच्या शिस्तीच्या संदेश गेला असता. मात्र, तसे धाडस पक्षाने दाखविले नाही तर शरद पवारांनीही दाखविले नाही.
राष्ट्रवादीचे हसे, पवारांचे ऐकतोय कोण?

उलट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दुष्काळाबाबतच्या टिकेकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण पवारांनी दाखविले. शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर त्यांची प्रतिक्रिया दिली ती अशी, अशा पोरकट टीकांवर लक्ष द्यायचं असतं का? दुष्काळाचे प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहे ते महत्त्वाचे आहेत. केवळ दुष्काळाबाबत शरद पवार बोलण्यावर भर देत आहेत. राज्यात आणि केंद्रात सरकार असताना आधीपासून का नियोजन केले गेले? तर दुसरीकडे मुलांचे शाही विवाह करणारे भास्कर जाधव यांची देखील पाठराखण केली आहे. भास्कर जाधवांनी महाराष्ट्राची माफी मागितली आहे. त्यामुळे आपण हा विषय काय सारखा काढता आहात, असे पवारांनी मीडियाला सुनावले. एकीकडे उधळपट्टी करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही म्हणायचे. आणि माफी मागितल्याने प्रश्न सुटतो, असे पवारांनी दाखवून दिलेय. त्यामुळे राष्ट्रवादीचे दुष्काळाबाबत हसे झालेय, हेच दिसते.

ताजा कलम

आदेशाचे पालन न करणाऱ्या आमदार, मंत्री आणि नेत्यांवर कारवाई अपेक्षित होते. दुष्काळाची गंभीरता स्वत:ला समजते, असा समज असणाऱ्या नेत्यांकडे पवारांनी दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. मी मारल्या सारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असं बोटचेपे राष्ट्रवादीचे धोरण झाले आहे. मात्र, एखाद्या मंत्र्याची किंवा आमदाराची बाब अधिकाऱ्यांनी तात्काळ केली नाही, तर त्याची उचलबांगडी करायची, हे राष्ट्रवादीला शोभते का? वचक निर्माण करण्यासाठी समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून काम केले तर ते शक्य होते. जनतेच्या रेट्यापुढे सरकारला झुकावे लागले आणि सुनील केंद्रकर यांची बदली रद्द करावी लागली, त्यामुळे दुष्काळात राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीचे हसे झालेय.

First Published: Sunday, February 24, 2013, 14:52


comments powered by Disqus