Last Updated: Thursday, March 21, 2013, 13:22
www.24taas.com, नवी दिल्लीवीस वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणातील अंतिम निकाल वाचनास सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कस्टम अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. त्याचवेळी दहशतवाद हा प्लेग रोगासारखा आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हटले.
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाची सर्वोच्च न्यायालय आज गुरुवारी सुनावणी झाली. अभिनेता संजय दत्तसह शंभर जणांवरील निर्णय आज सुनावला गेला. प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र, अन्य दहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना कोर्टानं जन्मठेप सुनावली आहे.
बॉम्बस्फोट खटल्यातील अन्य दहा जण अशिक्षित आणि गरीब होते. त्यांना प्याद्यासारखं वापरण्यात आलं, असं नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सहानुभूती दाखवली आहे. तर संजय दत्तला सहा वर्षांची झालेली शिक्षा कमी करून पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अभिनेता संजय दत्त याला सहा वर्षांची शिक्षा १ वर्षानं कमी करुन पाच वर्ष करण्यात आलीये. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आलीये. संजय दत्तनं यापूर्वी १८ महिन्यांचा कारावास भोगलेला आहे. त्यामुळं आता त्याला पुन्हा पोलिसांना शरण जावं लागणार आहे. चार आठवड्यात संजय दत्तला शरणागती पत्करावी लागणार आहे.
First Published: Thursday, March 21, 2013, 13:19