Last Updated: Monday, March 25, 2013, 13:10
www.24taas.com,मुंबईराज ठाकरे यांनी आमरावती येथे भाषणात केलेल्या इंडियाबुल्स कंपनीवरील टीकेचे पडसाद मुंबईमध्ये उमटले. मुंबईतील परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यातील सभांचा रविवारी शेवटचा टप्पा होता. सभेपूर्वीच इंडियाबुल्स कंपनीच्या प्रकल्पाल राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता. आपल्या जाहीर सभेतही राज ठाकरे यांनी इंडियाबुल्सला लक्ष्य केलं होतं. जनतेचं प्यायचं पाणी आणि शेतीसाठी लागणारं पाणी पळवून ते इंडियाबुल्सला पुरवलं जातं, असं राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं होतं.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यांचे पडसाद मुंबईत ताबडतोब उमटल्याचं दिसून आले. काही कार्यकर्त्यांनी परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. १० ते १२ जणांनी हा हल्ला केला आहे. हे कार्यकर्ते मनसेचे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. आज पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना भोईवाडा कोर्टात हजर केले जाणार आहे.
First Published: Monday, March 25, 2013, 10:41