Last Updated: Saturday, December 29, 2012, 15:15
www.24taas.com, नवी दिल्ली दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये गँगरेपला सामोऱ्या जाव्या तरुणीनं शेवटचा श्वास घेतला त्यानंतर शनिवारी जंतरमंतरवर आंदोलनकर्त्यांची एकच रिघ लागलीय. दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी या आंदोलनकर्त्यांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, संतापलेल्या लोकांच्या विरोधामुळे त्यांना आपला बेत रद्द करावा लागला.
दिल्लीमध्ये १६ डिसेंबर रोजी पॅरा मेडिकलच्या एका विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये गँगरेप झाला होता. त्यानंतर उपचारासाठी तिला सिंगापूरला पाठवण्यात आलं होतं. पण, इथंही त्या तरुणीची प्रकृती आणखीनच बिघडली आणि अखेर तिनं शनिवारी पहाटे २.१५ वाजता अखेरचा श्वास घेतला. पीडित तरुणीच्या मृत्यूची बातमी काही तासांतच अवघ्या देशभर पसरलीय आणि सारा देश शोकसागरात बुडालाय.
शनिवारी सकाळी दिल्लीच्या इंडिया गेट आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी कलम-१४४ लागू करण्यात आलंय. जंतर-मंतरवर आंदोलकांना विरोध प्रदर्शनासाठी परवानगी देण्यात आलीय. याठिकाणीच आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यासाठी शिला दीक्षित पोहचल्या होत्या. पण आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे आणि संताप पाहून त्यांना माघारी फिरावं लागलं.
First Published: Saturday, December 29, 2012, 15:15