Last Updated: Monday, February 11, 2013, 21:47
www.24taas.com, कर्जतराज्यात विविध ठिकाणी अचानक पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर कर्जत, खालापूर आणि लोणावळ्यातही सरी बरसल्या आहेत.
राज्यात एकीकडे मराठवाड्यातली अनेक गावं दुष्काळानं होरपळत असताना दुसरीकडे काही ठिकाणी पाऊस बरसतोय. पाऊस पडत नाही म्हणून मराठवाड्यातला शेतकरी अडचणीत आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये अचानक पाऊस पडल्यानं द्राक्ष उत्पादक संकटात आलाय. आंबा उत्पादकांनाही या अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसला आहे.
लक्षद्वीपपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत वातावरणामध्ये द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी कमी दाबाच्या पट्ट्याची एक विशिष्ट अवस्था निर्माण होते. यामध्ये दक्षिणेला पश्चिम दिशेने तर उत्तरेला पूर्व दिशेने वारे वाहतात. त्यालाच द्रोणीय स्थिती असं म्हंटलं जातं. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय. पुढच्या ४८ तासांपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
First Published: Monday, February 11, 2013, 21:47