ते दिवस राहिले नाहीत.... , diwali festival in Konkan

ते दिवस राहिले नाहीत....(लेख)

ते दिवस राहिले नाहीत....(लेख)
.



आई माझी सहामाही परीक्षा झाली की मी अजिबात अभ्यासाला हात लावणार नाही. मी खूप मजा करणार! मला नविन कपडे हवेत आणि फटाके. मी खूप फटाके फोडणार. मला आधी सांग तू बाबांना काय काय सांगणार?...हा संवाद कोकणात दिवाळीची चाहूल लागल्यावर शाळेत जाणाऱ्या छोट्या मंडळींकडून ऐकायला मिळतो. आपल्या बाळाचा आनंद पाहून आई बोलण्याचा प्रयत्न करीत असते. पण तिच्या बाळाला आईचे काही ऐकायचे नसते, हेच संवादातून जाणवते. तर दुसरीकडे घरात दिवाळीआधी फराळाची तयारी करण्यात आईची तारांबळ असते. घरात खमंग वास आला की समजावे काही दिवसांवर दिवाळी आली आहे. हे चित्र कोकणातील खेड्यापाड्यात दिसून येते.

ते दिवस राहिले नाहीत....(लेख)

दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी. याला कोकणात अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो. ही परंपरा व्यापारीवर्गाने आजही टिकवून ठेवली आहे. तर धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी पूजनही करण्याची परंपरा आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये या परंपरेला महत्त्व दिले गेलेय. दिवाळीत धन्वंतरी पुजनाच्यावेळी कडुनिंबाची पाने खाण्याची किंवा सात्विन वृक्षाच्या सालीचा रस प्राशन करण्याची प्रथा आहे. ही प्रथा लोप पावण्याची भीती आहे. आजही ही प्रथा काही ठिकाणी दिसते.

दिवाळीसाठी बाळगोपाळांची लगबग सुरू असते. कोणी गड-किल्ले बनविण्यासाठी तयारी करतो. किल्ला तयार झाला की आपला लाडका राजा शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी मावळे आणण्यासाठी बाबांचा हात पकडून बच्चे मंडळी बाजारात जातात. मात्र, हे चित्र आता बदलत आहे. निसर्गाचा होणार ऱ्हास आणि वाढत्या सिमेंटच्या जंगलात आता हे चित्र दिसत नाही. काही ठिकाणी ही परंपरा जपण्याचा प्रयत्न काही संस्था किल्ले स्पर्धा घेऊन करताना दिसत आहे. कोकणात गड-किल्ले आजही आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांचे बुरूज ढाळत आहेत. ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने जुन्या आठवणी बच्चे मंडळींमुळे ताज्या होतात.

कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत. दीपावली म्हणजे दिव्यांच्या ओळी. कोकणातील देऊळ आणि मंदिरांमध्ये होणारा दीपोत्सव ही एक वेगळीच ओळख आहे. आजही गावागावांतील देवळांसमोर दीपस्तंभ आहे. हे दीपस्तंभ दिवाळीत दिव्यांनी उजळून निघतात. पूर्वी या दीपस्तंभांवर पणत्या ठेवल्या जात असत. आता मात्र, यात थोडासा बदल झालेला दिसून येत आहे. विजेच्या तोरणांना अधिक पसंती दिली जात आहे. घरांसमोरच्या अंगणात आकाश कंदिलांचा झगमगाट फारसा नसला तरी अजूनही बांबूच्या कामट्यांपासून चांदणी किंवा आकाश कंदील बनविण्यावर भर दिसतो. तर काही ठिकाणी ` रेडिमेड` आकाश कंदिलांचा प्राधान्य दिले जात आहे. दिवाळी निमित्ताने कोकणात येणारे चाकरमानी चिनी बनावटीचे कंदील आणि विजेच्या दीपमाळा एक नाविण्य म्हणून आणत असल्याचे चित्र दिसत आहे. बांबूंच्या कामट्यापासून बसविल्या वस्तुंचा जागा चिनी बनावटीने घेतली पाहायला मिळत आहे. आजही रांगोळी काढण्याची प्रथा दिसून येते. घरासमोर रांगोळी काढली जाते.

दिवाळी सणात नरकचतुर्दशीला महत्त्व आहे. नरक चतुर्दशी दिवशी पहाटे लवकर उठून उठणे लावून गरम पाण्याने अभ्यंग स्नान करणे. त्यानंतर कारीट फोडणे फोडले जाते. तेही डाव्यापायाच्या अंगठ्याने. यासाठी घराघरांतून शर्यती लावल्या जातात. ते कारीट फोडल्यानंतर त्यातील बी जीभेला जावयाची आणि आपल्या माथ्याला. कारीटाचे बी जीभेला लावल्यानंतर तोंड कडू होते. मग तोंड वाकडे करून अंग फुसून बच्चे मंडळी नविन कपडे अंगावर चढवून फटाके फोडायला धूम ठोकतात. तिकडे आई हाक मारून अरे, दिवाळीचा फराळ कर, असे सांगत असते. मात्र, बच्चे मंडळींचे सर्व लक्ष फटाके फोडण्याकडेच असते, असे चित्र पाहायला मिळते. तसेच अभ्यंग स्नानाच्यावेळी जो उशीरा उठेल, तो नरकात जातो, असाही एक समज आहे. अंगणातील तुळशी वृंदावनासमोरची जागा शेणाने सारवून घेऊन, त्यावर कडू चव असणारे `कारीट` ठेवून ते डाव्या पायाच्या आंगठ्याने फोडले जाते. मग नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. त्याआधी आई किंवा पत्नी प्रत्येकाला आरती घेऊन ओवाळते. त्यानंतर घराघरांमध्ये दिवाळीच्या फराळावर ताव मारला जातो.

दक्षिण कोकणात नरक चतुर्दशी या दिवसाला ` चावदिस` असंही म्हटलं जातं. या दिवशी कोकणात दिवाळी फराळ पदार्थांना कमी स्थान असतं. या दिवशी घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांना महत्व असते. त्यातही हे पोहे अगदी पारंपरिक पध्दतीने केले असतील तर त्याची चव न्यारी असते. खासकरून या दिवशी आपल्या मित्रमंडळींना बोलावून त्यांना पोहे खाऊ घातले जाते. घराघरातून मात्र न्याहारीसाठी फोडणीचे खमंग पोह्यांसोबत केळीच्या पानात सजलेली रताळी ठेवलेली असतात. तिखट पोहे, गोड पोहे, गूळ पोहे, दूध पोहे , बटाटा पोहे आदी प्रकार या निमित्ताने चाखायला मिळतात. आज ही प्रथा कमी झालेली दिसत आहे.

नव्या भाताचे पोहे दिवाळी निमित्ताने काढले जातात. या पोह्यांपासून चिवडा तयार केला जातो. तर घरी व्हायनामध्ये (लाकडी उखळ) कांडलेल्या पोह्यांची चव काही वेगळीच असते. मात्र आता हे सगळं बदललं आहे. गावठी भातांच्या पोह्याची चव कुठेही चाखायला मिळत नाही. पोह्याचं कांडप करतांना वयोवृध्द महिलांकडून म्हटल्या जाणाऱ्या ओव्याही आता कानावरही पडत नाही. मात्र, पूर्वी पहाटेच्यावेळी ओव्या ऐकण्याची गंमत औरच असायची. आता नोकरी निमित्ताने तरूण शहरांकडे गेला. त्यामुळे कोकणची जी काही मजा होती, ती आता बदलत गेली आहेत. सणामधला उत्साहही कमी झालेला दिसत आहे.
ते दिवस राहिले नाहीत....(लेख)

कोकणात लक्ष्मीपूजन दिवशी सायंकाळी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. नैवेद्य म्हणून ` साळी` लाह्या आणि `बतासे` वाटण्याची प्रथा आजही आहे. घरात, दुकानात ताटामध्ये पैसे, नाणी ठेवून त्याचीच लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. जमा-खर्चाच्या वह्याही बदलल्या जाता . या निमित्ताने आंब्याच्या पानांचे तोरण हे सुध्दा विशेष मानले जाते. तर कार्तिक शुध्द प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेला, विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी कोकणात काही ठिकाणी प्रतिकात्मक शेणाचा गोठा तयार केला जातो. यावेळी कारेटाला ‘हिर` (नारळाच्या झावळांपासून काढण्यात आलेली हिर) टोचून श्रीकृष्णाचे रूपक बनविले जाते. कारटाचा अर्धा भाग घेऊन त्याचीच वाटी तयार करून त्यामध्ये दही नैवेद्य म्हणून ठेवले जाते. काही ठिकाणी त्याऐवजी ` रोवण ` करण्याची पध्दत आहे. ज्या ठिकाणी दुर्गादेवीची पूजा होत नाही, तेथे रोवण केले जाते. गोठ्यातील जनावरांचे शिंगे रंगविण्याची आणि जनावरांना गोडधोड खाऊही घालण्याची प्रथा आहे. मात्र आता पाळीव जनावरे दिसत नाहीत. त्यामुळे ना शेण आणि प्रथा. कोकणात भाऊबीज मात्र धुमधडाक्यात साजरी केली जाते.

विशेषतः रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी बलिप्रतिपदेला एक गमतीदार प्रथा आहे. या दिवशी सकाळी घरातील कचरा भांड्यात एकत्र करायचा, त्यात राखाडी, एक झाडू, एक नाणं, थोडाचा फराळ टाकायचा नंतर त्यात पणती पेटवायची आणि मग ते भांडं एकाने हातात घेऊन निघायचे. त्याच्या मागून दुसऱ्याने ताट लाटण्याने वाजवत घराच्या आंगणाबाहेर जायचे. नंतर तेथे तो कचरा पेटवून द्यायचा आणि फटाके वाजविण्याची प्रथा आहे. अशा धावपळीत दिवाळीचे दिवस सरतात आणि तुलसी विवाहाने कोकणातील दिवाळीची समाप्ती होते. असा आनंदायी आनंदाचा, उत्साहाचा, जल्लोषाचा, दीपोत्सवाचा सण काही वेगळाच असतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 1, 2013, 17:25


comments powered by Disqus