Last Updated: Friday, August 23, 2013, 23:09
स्नेहा अणकईकर,
असोसिएट बुलेटीन प्रोड्युसर,
झी २४ तास मुंबईत २२ ऑगस्टच्या काळकुट्ट अंधाऱ्या रात्री ‘ती’च्या उमलत्या स्वप्नांचा चुरगडा झाला... पाच जणांनी केलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं तिच्या शरीराला कमी पण मनाला मात्र पुरतं रक्तबंबाळ केलं... तिच्या या भावना शब्दात मांडणं तसं कठिणच पण काय वाटत असेल तिला या क्षणी?... समाजाबद्दल घृणा वाटत असेल ‘ती’ला? याच समाजासमोर धाडसानं पुन्हा उभं राहण्याची जिद्द दाखवील ती?
'ती'च्या याच भावना प्रांजळपणे मांडण्याचा केलेला हा एक छोटासा प्रयत्न... स्वप्नांचं शहर मुंबई.... रोज लाखो तरुण तरुणी डोळ्यांत मोठमोठी स्वप्नं घेऊन या शहरात येतात....मीही त्यांच्यापैकीच एक.... करीअर करीन तर मुंबईतच असा निर्धार करत मुंबई गाठली... हे शहर सगळ्यांचं हसतमुखानं स्वागत करतं.. सगळ्यांना सामावून घेतं.... असं मुंबईबद्दल बरंच ऐकलं होतं... त्यामुळे सुरुवातीपासूनच खूप कम्फर्टेबल होते.... नवं शहर, नवी माणसं, मॅगझिनमधला माझा हॅपनिंग जॉब... सगळं काही मस्त चाललं होतं.... मी सत्य शोधणा-यांच्या जमातीतली... अर्थात पत्रकार... पण लेखणीपेक्षा कॅमे-याच्या लेन्सवर माझं जास्त प्रेम.... रोज नव्या असायनमेंटसाठी कॅमेरा हाती घ्यायचा आणि या शहराचे नवनवे अँगल्स शोधून क्लिक करत सुटायचं... त्याहीदिवशी मी अशीच कॅमेरा घेऊन माझ्या सहका-याबरोबर निघाले. आज विषय होता मुंबईतल्या पडक्या बिल्डिंग्स... फिरत फिरत आम्ही महालक्ष्मीमधल्या शक्ती मिल कम्पाऊण्डमध्ये आलो. एकदम लोनली प्लेस...

संध्याकाळी सहा ते सव्वा सहाची वेळ.... सूर्यास्त जवळ आला होता... त्या कातरवेळी शक्ती मिलमधल्या पडक्या बिल्डिंगस आणखी भयाण वाटत होत्या. तीच भयाण विषण्णता कॅमे-यात कशी टिपायची, याचा विचार सुरू होता... तेवढ्यात दोन पोरं तिथं आली आणि इथे फोटोग्राफी करायची नाही, असा दम द्यायला लागली.फोटोग्राफी करायची तर आमच्या साहेबांची परवानगी घ्या, असं म्हणाली.... एखादी खाजगी जागा असेल, तर त्या मालकाला सांगू की आम्ही मॅगझिनसाठी प्रोजेक्ट करतोय, असं म्हणत मी आत गेले.... माझ्या मित्राला त्यांनी बाहेरच थांबवलं आणि बेदम चोपलं.... त्या खोलीत कुणीही साहेब नव्हता, त्याचे पंटर्स नव्हते.... तिथे होते ते पाच लांडगे आणि त्यांचे वखवखलेले डोळे... ती निर्ढावलेली मुर्दाड जनावरं... त्यांनी समोरच्या भक्ष्याचा फडशा पाडला.... बाहेर सूर्यास्त होत होता.... जगाला अंधारात टाकून सूर्य निघून गेला.... आणि काळ्याकुट्ट अंधारात मी बुडून गेले......
कॉलेजमध्ये असताना मी स्त्री-पुरुष समानतेवर एक प्रोजेक्ट केला होता. त्यावेळी या विषयावर मी किती तावातावानं बोलले होते.... आज समजून चुकलं स्त्री-पुरुष किती असमान आहेत... आणि हेच सत्य आहे..... पडक्या बिल्डिंगसची भयाणता कॅमेऱ्यात कैद करायची होती... ती करताना कॅमे-यातलं मेमरी कार्डच करप्ट झालं... पण अन्यायाविरोधात आवाज उठवणं, हेच माझं कर्मक्षेत्र... यावेळी तो अन्याय माझ्याच विरोधात घडलाय...... पण आय बेट..... मी या सगळ्यामधून सावरेन.... मला लवकरात लवकर माझं ऑफिस जॉईन करायचंय.... एका नव्या असायनमेंटसाठी..... उद्याचा सूर्योदय मला हा चान्स नक्की देईल....
चार गोष्टी... चार दुर्दैवी महिलांच्या अत्यंत सुरक्षित शहर अशी मुंबईची एकेकाळची ओळख..... पण आता ही ओळख बदलतेय....गेल्या चार महिन्यातल्या चार दुर्दैवी घटनांनी मुंबईकरांची झोप उडवलीय.... या चार गोष्टी आहेत चार वेगवेगळ्या महिलांच्या... पण त्या सगळ्या गोष्टींचा शेवट एकच आहे.... मुंबई सुरक्षित नाही...
२ मे..... प्रीती राठी.... तिला संरक्षण दलात नर्स म्हणून रुजू व्हायचं होतं.... एका अर्थानं देशाची सेवाच करायची होती.... खूप सारी स्वप्नं घेऊन मुंबईत आलेल्या प्रीतीचं पहिलं पाऊल मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसवर पडलं..... तेवढ्यात तो धावत आला आणि त्यानं प्रीतीच्या चेह-यावर ऍसिड टाकलं...... कळवळलेली प्रीती खाली कोसळली ती पुन्हा कधी उठूच शकली नाही......
२७ जुलै - मुंबईकर महिलामुळची मुंबईचीच असल्यानं मुंबईची नस ती पुरती ओळखून होती.... पहाटेच्या वेळीही ट्रेननं जायला तिला कधीच भीती वाटली नाही... तिच्या नोकरीची वेळच तशी होती.... चर्चगेट-बोरिवली लोकलमधून ती पहाटे प्रवास करत होती.... त्या भल्या पहाटेच लोअर परळ आणि महालक्ष्मी स्टेशनवर एका रोडरोमियोनं तिचा विनयभंग केला... रेल्वे डब्यात एकही पोलीस नव्हता..... य़ा घटनेनंतर रेल्वेतून रोज प्रवास करणा-या सगळ्या महिला हादरल्या.
१८ ऑगस्ट - मिशेल मार्क मुंबईत कामासाठी आलेली अमेरिकन महिला.... रविवारी दुपारची वेळ..... मिशेलनं चर्चगेटहून बोरिवली ट्रेन पकडली. मरीन लाईन्स स्टेशनवर एक भामटा चढला आणि त्यानं तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिनं प्रतिकार केल्यावर त्यानं मिशेलवर ब्लेडनं वार केले. मिशेलच्या चेह-यावर जखमा झाल्या आणि हातावर चार टाके पडले. मुंबईतला हा अनुभव ती कधीच विसरू शकणार नाही.
२१ ऑगस्ट - फोटो जर्नलिस्ट पत्रकारितेत करिअर करायचं म्हणून तिनं मुंबई गाठली.... मॅगझिनच्या एका असायनमेंटसाठी शक्ती मिल कम्पाऊण्डमधल्या बिल्डिंगसचे तिला फोटो काढायचे होते.... फोटो काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असं म्हणत तिला पाच जण एका खोलीत घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केला.... दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेनं सगळा देश हादरला.
मुंबईतल्या गेल्या चार महिन्यांतल्या या चार वेगवेगळ्या कहाण्या.... पण या चारही गोष्टींचा शेवट एकच.... मुंबई सुरक्षित नाही..... खरं तर आम्हाला मुंबईबद्दल केवढा विश्वास होता.... आमच्या मुंबईत दिल्लीसारखं नाही, अगदी रात्री बारापर्यंत मुली एकट्या फिरू शकतात, असं आम्ही अभिमानानं सांगायचो.... अगदी दिल्लीत निर्भयावर बलात्कार झाला तेव्हाही मुंबई सुरक्षेच्या दृष्टीनं कशी ग्रेट आहे, त्याचे आम्ही एकमेकांना व्हॉटसअपवरुन मेसेजेस पाठवले आणि या सुरक्षित मुंबईच्या फेसबुकवरच्या पोस्टला अनेकांनी लाईकही केलं.... पण हे सगळं खोडून काढणा-या या चार मुलींच्या चार कहाण्या.... आमची मुंबई अशी नव्हती..... तिच्याबरोबर खूप सुरक्षित वाटायचं..... तिची जिंदादिली आम्हाला खूप आवडायची.... तिच्याबरोबर बेफाम जगता यायचं.... पण आता भीती वाटते..... मुंबईत फिरणा-या त्या विकृत जनावरांची.... त्या विकृतीला वेळच्या वेळी ठेचायला हवं. मुंबईचं मुंबईपण पुन्हा मिळवायला हवं...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, August 23, 2013, 22:36