बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व
करारी आणि सडेतोड बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे हे सगळ्यात महत्त्वाचे पैलू.... शिवसेनेच्या वाटचालीत बाळासाहेबांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये त्यांचा करारीपणा दिसून आला. मुंबईत मराठी माणसावर परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, हा इशारा बाळासाहेबांनीच सगळ्यात पहिल्यांदा घालून दिला. बाळासाहेब जो विचार करायचे तो सडेतोडपणे मांडायचे आणि प्रत्यक्षातही आणायचे...... धर्मांध मुसलमानांना देशात राहण्याचा अधिकार नाही, हे वादग्रस्त मत बाळासाहेबांनी सडेतोडपणे मांडलं. मतांसाठी कुणावरही डोळा ठेवला नाही. महाराष्ट्रात मी मराठी आहे आणि देशात हिंदू आहे, हीच बाळासाहेबांची भूमिका होती. मी लोकशाही मानत नाही, असं बाळासाहेब निर्भीडपणे आणि ठणकावून सांगायचे.... राजकारण्यातल्या भल्याभल्यांवर टीका करताना बाळासाहेब कधीच कचरले नाहीत. राजकारणात निर्भीड आणि करारी असणारे बाळासाहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र अत्यंत प्रेमळ होते. त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येक माणसाशी ते आवर्जून संवाद साधायचे. कुणाचेही भलते लाड नाहीत, पण गरजवंताला मदत करताना त्यांचा हात आखडता कधीच नव्हता.
बाळासाहेबांची भाषा
बाळासाहेबांच्या यशाचं गमक होतं त्यांच्या ठाकरी भाषेत.... सर्वसामान्य मराठी माणसाशी पटकन नाळ जोडणारी बाळासाहेबांची भाषा..... कुठलाही शहाणपणाचा आणि बुद्धीमत्तेचा आव न आणता सामान्य मराठी माणसाला आवडेल तीच भाषा बाळासाहेब बोलायचे..... पण त्या भाषेला तलवारीची धार असायची. अगदी राजकारण्यांना शिवी हासडताना बाळासाहेबांनी कधीच भीडभाड ठेवली नाही. एखाद्यावर टीका करायची म्हणजे बाळासाहेब त्याला ठाकरी भाषेनं अक्षरशः सोलून काढायचे..... बाळासाहेबांच्या भाषणात निव्वळ टीका किंवा आरोप नसायचे..... अस्सल ठाकरी भाषेत पंचनामाच मांडला जायचा...... पण याच ठाकरी भाषेनं महाराष्ट्राला जागं केलं..... त्याच आक्रमक भाषेमुळे मराठी माणसाला त्याच्यावरच्या अन्यायाची जाणीव झाली आणि तो एकत्र झाला.
बाळासाहेब आणि शिवसैनिक
‘साहेब’ याच नावानं शिवसैनिक बाळासाहेबांना ओळखतो. साहेबांसाठी जीवावर उदार होणारे असंख्य मावळे या महाराष्ट्रात आहेत. साहेबांच्या एका शब्दावर मुंबई बंद पडत होती, साहेबांनी एक साद घालताच महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शिवसैनिक साहेबांसाठी धावून यायचे. आदेश हा फक्त साहेबांचाच... इतर कुणीही शिवनसैनिकांच्या रोषाला आवर घालणं शक्य नव्हतं. १९६९ साली बाळासाहेबांना सीमाप्रश्नाच्या आंदोलनाप्रकरणी अटक झाली आणि शिवसैनिकांनी असं काही रान पेटवलं, मुंबईत अशी काही जाळपोळ आणि तोडफोड सुरू झाली की नियंत्रणात आणण्यासाठी तुरुंगातूनच शिवसैनिकांना शांततेचं आवाहन करा, असं बाळासाहेबांना सांगण्याची नामुष्की सरकारवर आली. बाळासाहेबांच्या आवाहनाचा मजकूर त्यावेळी रेडिओवरुन प्रसारित करण्यात आली, त्याची पोस्टर्स जागोजीगी लावण्यात आली, तेव्हा कुठे मुंबई शांत झाली. ज्याला अटक केली, त्यानंच शांततेचं आवाहन करावं, असं सांगण्याची विचित्र वेळ सरकारवर आली. शिवसैनिकाला मदत करताना बाळासाहेबांचा हात कधीच आखडता नव्हता. ती मदत आर्थिक स्वरुपातली असो, किंवा शिवसैनिकाच्या पाठीवर मायेचा हात असो... बाळासाहेब सभेत बोलताना नेहमी माझा शिवसैनिक असाच उल्लेख करायचे, तो शेवटपर्यंत कायम होता... साहेबांची फक्त एक झलक पाहण्यासाठी शिवतीर्थ खचाखच भरायचं... साहेबांचा प्रत्येक शब्द जीवाचे कान करुन शिवसैनिक ऐकायचा... शिवसैनिकांची बाळासाहेबांवर प्रचंड निष्ठा, श्रद्धा किंबहुना बाळासाहेब हे शिवसैनिकांचं अक्षरशः दैवत होते...
बाळासाहेबांचं नेतृत्व
बाळासाहेबांनी नेहमी फक्त एकच आदर्श ठेवला तो शिवरायांचाच... शिवशाही हेच बाळासाहेबांचं स्वप्न होतं... मराठी माणूस त्याच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी संघटित व्हायलाच हवा हे बाळासाहेबांनी वेळीच ओळखलं आणि १९ जून १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाली. खंबीर आणि दृढनिश्चयी सेनापतीच्या नेतृत्वाखाली मराठी माणूस एकत्र आला. महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांनी कधीच जात, धर्म, पंथ याचा भेदभाव केला नाही, राष्ट्र आणि महाराष्ट्रप्रेमानं भारलेल्या सगळ्यांना एकत्र घेऊनच शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे उद्दिष्ट ठेवून संघटनेचं जाळं घट्ट विणलं गेलं. जातीपातीला बाळासाहेबांच्या राजकारणात कधीच स्थान नव्हतं.... क्रिकेट मॅचमध्ये सिक्सर मारणाऱ्या अझरुद्दीनलाही बाळासाहेबांनी आपलं मानलं, आणि अगदी तळागाळातला झाडू मारणारा, मासे विकणाऱ्यालाही जवळ केलं. म्हणूनच बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये झाडू मारणारा सच्चा शिवसैनिकही नगरसेवक होऊ शकला. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेब सेनापती असले तरी त्यांनी स्वतः कुठलीच पदं भूषवली नाहीत. १९९५ साली युतीची सत्ता आल्यावर बाळासाहेब मुख्यमंत्री होणार का, अशा चर्चा सुरू असतानाच बाळासाहेब मुख्यमंत्रीपदापासून दूर राहिले आणि सच्च्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करुन राजकीय पंडितांचे अंदाजही चुकीचे ठरवली. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना सत्ता आणि पदं वाटून टाकली. बाळासाहेबांनी कधीच कुठलीही निवडणूक लढवली नाही, पण दूरदृष्टी आणि कणखर नेतृत्वानं सत्ता गाजवली.
बाळासाहेबांचे महत्त्वाचे राजकीय टप्पे
अन्यायाविरोधातली चीड बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमधून उमटत होती... १९६० च्या दशकातली फ्री प्रेस जर्नलमधली बाळासाहेबांची व्यंगचित्रं चांगलीच लोकप्रिय व्हायला लागली. त्याच दरम्यान व्यंगचित्रांसाठी स्वतंत्र साप्ताहिक असावं, असं बाळासाहेबांना वाटू लागलं आणि ऑगस्ट १९६० मध्ये व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’ची स्थापना झाली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते मार्मिकचा प्रकाशन सोहळा झाला.
बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमुळे मराठी माणूस जागा झाला, पण त्याला एकत्र आणण्यासाठी संघटना काढण्याची कल्पना बाळासाहेबांना सुचली. प्रबोधनकारांनी या संघटनेसाठी नाव सुचवलं शिवसेना आणि १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसांचे प्रश्न घेऊन राजकारणात उतरलेल्या शिवसेनेनं अवघ्या एका वर्षात ठाणे नगरपालिकेवर वर्चस्व मिळवलं. लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९६८ मध्ये मुंबई महापालिकाही शिवसेनेच्या ताब्यात आली. बाळासाहेबांनी धडाडीनं सीमाप्रश्न हाती घेतला याच आंदोलनाप्रकरणी बाळासाहेबांना ९ फेब्रुवारी १९७० ला अटक झाली. सत्तरच्या दशकात शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली. पुढे शिवसेनेची भूमिका आणखी आक्रमक पद्धतीनं मांडण्यासाठी २३ जानेवारी १९८९ ला सामना हे वृत्तपत्र प्रत्यक्षात आलं. १९९० मध्ये २३.६४ टक्के मतांसह शिवसेना विरोधी पक्ष ठरला. मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले आणि पुढच्याच निवडणुकीत १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. १९८८ मध्ये शिवसेनेचा फक्त एक आमदार राज्याच्या विधानसभेत होता. आणि अवघ्या सात वर्षांत शिवसेनेची राज्यात सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पण गिरीश व्यास प्रकरणी मनोहर जोशींवर आरोप होताच, बाळासाहेबांनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंना मुख्यमंत्रिपद दिलं. पुढच्या निवडणुकीत युतीची सत्ता गेली. पण मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळला तर मुंबई महापालिकेवर मात्र शिवसेनेची सत्ता कायम राहिली.
प्रवाहाविरोधातले बाळासाहेब
बाळासाहेबांनी प्रवाहाविरोधात भूमिका घेण्याचं धाडसही अनेकवेळा दाखवलं.... इंदिरा गांधींच्या आणीबाणीचंही सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांनी समर्थन केलं. १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त आरोपी झाल्यावर त्याच्या पाठीशी बाळासाहेब उभे राहिले. बोफोर्स प्रकरणी अमिताभ बच्चनचं नाव पुढे आल्यावर बाळासाहेबांनी त्यालाही आधार दिला. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना लिहिण्याचा मजकूर बाळासाहेबांनीच अमिताभला सांगितला होता. तुमचा दाऊद तर आमचा गवळी असं वादग्रस्त विधानही बाळासाहेबांनी केलं होतं. भ्रष्टाचाराविरोधातल्या लढ्याला बाळासाहेबांचा नेहमीच पाठिंबा होता... पण ज्यावेळी सगळा देश अण्णांच्या नावानं झपाटला होता, त्यावेळी अण्णा हजारेंना भेट नाकारण्याचं धारिष्ट्य बाळासाहेबांनी दाखवलं होतं. असे अनेक प्रवाहाविरोधातले निर्णय घेण्याचं धैर्य बाळासाहेबांनी दाखवलं. त्यांचे निर्णय चूक की बरोबर यावर निश्चितच वाद होऊ शकतो. पण प्रवाहाविरोधात निर्णय घेण्याचं धाडस दाखवणारे बाळासाहेब वेगळेच.
बाळासाहेब आणि साहित्यिक, अभिनेते, क्रिकेटपटू
साहित्यिकांशी बाळासाहेबांचे संबंध नेहमीच उत्तम होते. पु.लंशी बाळासाहेबांचा विशेष जिव्हाळा, पु.ल, सुनीताबाई आणि बाळासाहेब यांची अनेकवेळा मैफल जमायची. लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशी, शहनाई वादक बिस्मिल्ला खान, दिलीप कुमार अशा कलाकारांशी बाळासाहेबांची चांगली दोस्ती होती. पण दिलीपकुमारनं पाकिस्तानचा पुरस्कार स्वीकारताच त्याच्यावर टीका करायलाही बाळासाहेबांनी मागे पुढे पाहिलं नाही.
बाळासाहेबांचं वैयक्तिक आयुष्य
बाळासाहेबांचा विवाह मीनाताई ठाकरे पूर्वाश्रमीच्या सरला वैद्य यांच्याशी झाला. बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव ही बाळासाहेब आणि मीनाताईंची तीन मुलं... बिंदुमाधवला बाळासाहेब प्रेमानं पिलगा म्हणायचे.
/marathi/slideshow/साहेब-गेले_165.html/10