Last Updated: Saturday, October 12, 2013, 15:27
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईशिवसेना नेते रामदास कदम यांनी मनोहर जोशींवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वादाला मनोहर जोशी जबाबदार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. जोशी सरांच्या टीकेमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोपही रामदास कदमांनी केला आहे.
तसंच पक्षप्रमुखांवर अशाप्रकारे टीका करुन जोशी सर पक्षाला ब्लॅकमेल करतायत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेत फायलिन वादळ आलं आहे. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींवर हल्लाबोल केलाय.
जोशींचे विधान निषेधार्ह असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे जोशींच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मौन बाळगलंय. पंतांच्या विधानाशी संबंध नसल्याचं राज यांनी म्हटलंय. तर सध्या मनोहर जोशी शिवसेना सोडण्याची शक्यता कमी आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही अशी टीका करणे योग्य नाही, असे जोशींच्या टीकेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येकाची नेतृत्व करण्याची पद्धत वेगळी असते. बाळासाहेब हे बाळासाहेब आहेत. तर उद्धव हे त्यांचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे अशी टीका योग्य नाही, असे राऊत म्हणालेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, October 12, 2013, 15:00