Last Updated: Wednesday, February 13, 2013, 15:28
www.24taas.com, मुंबई ‘राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही बाळासाहेबांची आणि काही हितचिंतकांची इच्छा होती, मात्र ते दोघं एकत्र येत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार’ अशी खोचक आणि तरिही सूचक अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलीय.
राज ठाकरेंनी मंगळवारी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंबरोबर जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यावर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक या नात्यानं भुजबळांना प्रश्न विचारला असता प्रतिक्रिया देताना भुजबळांनी अशी प्रतिक्रिया दिलाय. राज्यात टोलनाके येण्याचं काम युती शासनाच्या काळातच झाल्याची आठवणही त्यांनी राज ठाकरेंना करून दिलीय.
‘सामना’ या वृत्तपत्रात छापून आलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी राज-उद्धव एकत्र येण्याचे संकेत दिले होते. पण, उद्धव ठाकरेंच्या या संकेतांना राज ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये साफ उडवून लावलं. ‘आपण स्वबळावर लढणार असून मला कुठल्याही युतीची गरज नाही... एकत्र येण्याची भाषा अशी वर्तमानपत्रात छापून केली जाते का?’ असा सवाल करत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या टाळीला टोला लगावला होता.
First Published: Wednesday, February 13, 2013, 15:24